वृत्तसंस्था, नवी दिल्ली
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि धडाकेबाज यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतची तंदुरुस्ती व लय आगामी बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेत भारतासाठी निर्णायक ठरेल, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन चॅपल यांनी व्यक्त केले.

भारताने यापूर्वी ऑस्ट्रेलियातील लागोपाठ दोन मालिका जिंकल्या आहेत. त्यांना ऑस्ट्रेलियातील मालिका विजयाची हॅटट्रिक साधायची असेल, तर बुमरा आणि पंत यांनी तंदुरुस्त राहणे, तसेच त्यांनी खेळातील लय कायम राखणे महत्त्वाचे असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध होणारी तीन कसोटी सामन्यांची मालिका भारताला तयारीसाठी निर्णायक असल्याचेही चॅपेल म्हणाले.

हेही वाचा >>>IND vs BAN: “…म्हणून मी बांगलादेशची फिल्डिंग सेट केली”, ऋषभ पंतने दिलं अजय जडेजाचा उल्लेख करत दिलं मनं जिंकणारं उत्तर

‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बहुचर्चित मालिकेसाठी अधिकाधिक खेळाडूंना तंदुरुस्त राखणे आणि त्यांच्या खेळात सातत्य ठेवणे भारतासाठी आवश्यक आहे. यामध्ये पंत आणि बुमरा हे दोन खेळाडू केंद्रबिंदू ठरतात. भीषण मोटर अपघातानंतर कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन करणे ही पंतसाठी उल्लेखनीय बाब आहे. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून पंत यशस्वी ठरल्यास भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात पुन्हा मालिका विजयासाठी मोठी संधी असेल’’, असेही मत चॅपेल यांनी मांडले आहे.

हेही वाचा >>>IND vs BAN सामन्यात गोंधळ! मोहम्मद सिराज बांगलादेशच्या कर्णधाराशी भिडला, बोट दाखवतानाचा VIDEO व्हायरल

भारतासाठी बुमराचे महत्त्व विशद करताना चॅपेल म्हणाले, ‘‘ऑगस्ट २०२३मधील पाठीच्या दुखापतीनंतर पुनरागमन करताना बुमराने सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रारूपांत आपल्यावरील जबाबदारी चोख बजावली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि नंतर मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळताना त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या गेल्या दौऱ्यात बुमराला मोहम्मद सिराजकडून सुरेख साथ मिळाली. या दोघांची लय कायम राहणे या वेळीही भारतासाठी महत्त्वाचे आहे. यात बुमरा आक्रमणाचे नेतृत्व करेल.’’