ICC T20 World Cup: जसप्रीत बुमराहच्या जागी पर्यायी खेळाडू शोधत असताना आता टीम इंडियाला अजून एक धक्का बसला आहे. इंडिया टुडेच्या माहितीनुसार, आता दीपक चहरही आयसीसीच्या आगामी टी 20 विश्वचशकातून बाहेर पडला आहे.  टी 20 विश्वचषकातील चार राखीव खेळाडूंमध्ये दीपक चहरचा समावेश होता. ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत आयसीसी टी 20 विश्वचषक पार पडणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, दुखापतीनंतर दीपक चहरने ओडीआय मधून टीम इंडियात पुनरागमन केले होते. मागील महिन्यात झिम्बाम्बवे विरुद्ध सामन्यात दीपक चहरने उत्तम कामगिरी केली होती म्हणूनच विश्वचषकाच्या राखीव खेळाडूंमध्ये दीपक चहरचे नाव निश्चित झाले होते. पण विश्वचषक सुरू होण्याच्या अवघ्या चार दिवसांआधीच पाठीच्या दुखण्यामुळे चहर संघातून बाहेर पडला. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध ओडीआयनंतर आता चहर काही दिवस रजेवर असणार आहे असं समजतंय.

Video: टीम इंडियावर कपिल देव भडकले, म्हणाले “मला डिप्रेशन कळत नाही, तुम्हाला जमत नसेल तर IPL..”

चहरच्या जागी कोण? 

इंडिया टुडेच्या माहितीनुसार, दीपक चहरच्या जागी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर हे गुरुवारी 13 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियसाठी रवाना होणार आहे. हे तीन खेळाडू टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात भेटतील व सराव सत्रात सहभागी होतील असे समजत आहे.

बुमराच्या जागी कोण? 

टीम इंडियाच्या निवडसमितीतर्फे आता जसप्रीत बुमराच्या जागी मोहम्मद शमीचा विचार केला जात आहे. यापूर्वी शमीला बंगळुरू येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत एका शेवटच्या फिटनेस टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. मोहम्मद शमीने नुकतीच करोनावर मात केली आहे.

तसेच, सिराजमुळे टीम इंडियाची बाजू भक्कम होऊ शकते. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध ओडीआयमध्ये मोहम्मद सिराजचा खेळही लक्षवेधी ठरला होता. भारताने ही मालिका 2- 1 अशा गुणांनी जिंकली ज्यात सिराजचा मोलाचा वाटा होता. अहवालानुसार, ऑस्ट्रेलियन परिस्थितीत तीन वेगवान गोलंदाजांचे मूल्यांकन केल्यानंतर संघात बुमराच्या जागी नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. यात मोहम्मद शमी अनुभवामुळे आघाडीवर असल्याचे दिसते.

दरम्यान, टी 20 विश्वचषक 2022 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा पहिला सामना खेळला जाणार आहे, आशिया चषकातील पराभवाचा बदला घेण्याची ही संधी टीम इंडियासाठी महत्त्वाची ठरणार आहे.