Aditya Thackeray Slams BCCI: टी २० विश्वचषकात विजयी होऊन मायदेशी परतलेल्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत चाहत्यांचा महासागर उसळला होता. काहींनी या गर्दीवर टीका केली तर काहींना क्रिकेटप्रेमींचा उत्साह भावून गेला. संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारं हे जंगी सेलिब्रेशन पार पडताच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बीसीसीआयला उद्देशून खोचक विधान केले होते. “मुंबईतील सेलिब्रेशन हे बीसीसीआयला थेट इशारा देणारे होते, यापुढे बीसीसीआयने कधीच विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईपासून दूर नेता कामा नये” असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी कानउघडणी करण्याचा प्रयत्न केला होता. आता यावर भारतीय क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ठाकरेंना सडेतोड उत्तर दिले आहे. नेमकी आदित्य ठाकरेंची पोस्ट काय होती व त्यावर बीसीसीआयने काय प्रतिक्रिया दिली हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य ठाकरे बीसीसीआयला उद्देशून काय म्हणाले?

२०२३ मध्ये पार पडलेल्या आयसीसी ओडीआय विश्वचषकाचे यजमानपद हे भारताकडे होते. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळणार होता. अनेकांची अशी अपेक्षा होती की भारताचा अंतिम सामना हा मुंबईत वानखेडेवर पार पडावा पण त्याऐवजी बीसीसीआयने विश्वचषकाच्या फायनल्ससाठी गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम निवडले. वानखेडेवर सामना न झाल्यामुळेच भारताला पराभूत व्हावे लागले असेही कयास अनेकांनी बांधले होते.

आदित्य ठाकरे यांनी याआधी सुद्धा भाजपाने अनेक गोष्टी (रोजगाराच्या संधींपासून ते मोठे कार्यक्रम) मुंबईतून अहमदाबादला हलवल्याचा आरोप केला होता. या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान HT ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य म्हणाले होते की, “आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र, वेदांत फॉक्सकॉन, बल्क ड्रग्स पार्क आणि वैद्यकीय उपकरणांसह उद्योग आणि प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. अगदी विश्वचषकाचा अंतिम सामनाही मुंबईऐवजी अहमदाबादला हलवण्यात आला.”

आता २०२४ मध्ये जेव्हा टीम इंडियासाठी वानखेडेवर खास कार्यक्रम पार पडला तेव्हा हजारो चाहत्यांनी हजेरी लावली होती. मुंबईतील क्रिकेटप्रेमींचा दाखला देत ठाकरेंनी मुंबईतच विश्वचषकाचा अंतिम सामना व्हायला हवा अशी अप्रत्यक्ष मागणी करणारी ही पोस्ट शुक्रवारी लिहिली.

बीसीसीआयकडून आदित्य ठाकरेंवर पलटवार..

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आदित्य ठाकरेंच्या टीका वजा सूचनेला उत्तर देत म्हटले की, “फायनलचं ठिकाण ठरवणं हे बीसीसीआयचं काम आहे आणि ते करताना नेहमी एकाच शहराची निवड करता येणार नाही. १९८७ च्या विश्वचषकादरम्यान कोलकाता येथे अंतिम सामना झाला आणि कोलकाता हे शहर क्रिकेटसाठी मक्का (पवित्रस्थान) मानले जाते. दुसरं म्हणजे अहमदाबादच्या स्टेडियमची क्षमता १ लाख ३० हजार आहे आणि आम्हाला त्या क्षमतेचा देखील विचार करावा लागतो. कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियममध्ये सुद्धा सुमारे ६६ ते ८० हजार प्रेक्षक बसू शकतात. अन्य अनेक शहरांमध्ये सुद्धा मोठे स्टेडियम्स आहेत. आम्हाला निर्णय घेताना संपूर्ण देशातील सर्व ठिकाणांचा विचार करायचा असतो. तरीही मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये २०२३ ची उपांत्य फेरी पार पडली, सर्वच महत्त्वाचे सामने एकाच ठिकाणी मर्यादित करता येत नाहीत.”

हे ही वाचा<< “माझा अहंकार डोकं वर काढू..”, विराटने मोदींसमोर सांगितला मैदानातील किस्सा; किंग कोहलीची हळवी बाजू पाहा

दुसरीकडे, मुंबईत झालेल्या विजयी परेडदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी केलेल्या मेहनतीचे सुद्धा शुक्ला यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, “मुंबईकरांचा प्रतिसाद हा भारावून टाकणारा होता त्यामुळे मुंबईला प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न असतोच पण फायनल, सेमीफायनल कुठे आयोजित करावी हा निर्णय सर्वस्वी बीसीसीआयचा असावा. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक सामना हा तेवढाच महत्त्वाचा असतो.”

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray given straight strike reply by bcci vice president on selecting mumbai for world cup finals always says can not favor svs
Show comments