Virat Kohli Arshdeep Singh Bhangra Video : टीम इंडिया टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन बनल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओंचा पूर आला आहे. ११ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतीय खेळाडूंना सेलिब्रेशन करण्याची संधी मिळाली आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे खेळाडू आपला आनंद व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशात विराट कोहली आणि अर्शदीप सिंग यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये हे दोन्ही भारतीय बार्बाडोसमध्ये भांगडा करताना दिसत आहेत.

टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकल्याने भारतीय संघातील खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरला नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रिंकू सिंग, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद यांसारखे इतर अनेक खेळाडू देखील आहेत. विराट कोहली आणि अर्शदीप सिंग यांनी दिलर मेहंदीच्या ‘तुनक तुनक ‘ या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करून मैदानावर धुमाकूळ घातला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भारताने १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २० षटकांत आठ गडी गमावून १६९ धावा करता आल्या. या सामन्यात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा घेतलेला उत्कृष्ट झेल निर्णायक ठरला. या विजयासह भारताचा ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर २०११ साली भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

हेही वाचा – IND vs SA : भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर इरफान पठाण भावुक, रडत रडत सूर्याचे मानले आभार, VIDEO व्हायरल

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विराट कोहली निवृत्त –

विराट कोहलीच्या ७६ धावांच्या जोरावर भारताने टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात १७६ धावा इतकी मोठी धावसंख्या उभारली. यानंतर भारताने अवघ्या ७ धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद पटकावले आहे. संपूर्ण टी-२० विश्वचषकात शांत असलेली विराट कोहलीची बॅट तळपली आणि त्याच्या बॅटमधून बारतासाठी मॅचविनिंग खेळी पाहायला मिळाली. विराट कोहलीने ५९ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांसह ७६ धावांची खेळी केली. विराटच्या या खेळीसह विराटने रोहितचं म्हणणं खरं करून दाखवलं आहे. या विजयासह भारताचा विस्फोटक फलंदाज विराट कोहलीने मोठे वक्तव्य करत टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली आहे.

हेही वाचा – IND vs SA : “फायनल पाहताना माझे हृदयाचे ठोके वाढले होते अन्…”, टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाचे केले कौतुक

विश्वविजेतेपदासह टी-२० कारकीर्दीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला –

विराट कोहलीच्या या शानदार ७६ धावांच्या खेळीसाठी त्याला अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. यानंतर बोलताना विराट कोहलीने सर्वांनाच मोठा धक्का दिला आणि सांगितले, “हा माझा शेवटचा वर्ल्डकप आहे. हा माझा शेवटचा टी२० सामना आहे. विश्वविजेतेपदासह टी-२० कारकीर्दीला अलविदा करण्याचा मी निर्णय घेतला आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला वाटू शकतं की एकही धाव होणार नाही, पण काही दिवस तुमचे असतात. देवाचे आभार मानतो. मी संघाच्या विजयाच्या योगदान देऊ शकलो याचं प्रचंड समाधान आहे. अंतिम सामन्याच्या संधीचं सोनं करायचं होतं. मला भारतासाठी वर्ल्डकप जिंकायचा होता. परिस्थितीचा आदर करत मी खेळायचं ठरवलं. मी भारतासाठी शेवटचा टी२० सामना खेळलो. नव्या पिढीकडे मशाल सोपवण्याची वेळ आली आहे. युवा खेळाडू या जबाबदारीसाठी सज्ज आहेत.”