मेलबर्नच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर ५ विकेट्सने विजय मिळला आहे. त्याचबरोबर इंग्लंडने १९९२ च्या विश्वचषकाचा बदला पाकिस्तानकडून घेतला. १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने त्याच मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडचा पराभव केला होता. आता 30 वर्षांनंतर इंग्लंडने मेलबर्नमध्येच पाकिस्तानचा पराभव करून बदला घेतला आहे. तसेच सामना गमावल्यानंतर बाबर आझमच्या नावावर एक लाजिरवाण्या विक्रमाची नोंद केली आहे.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ८ गडी गमावून १३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने बेन स्टोक्सच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर १९ व्या षटकात ५ विकेट्स राखून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.

पाकिस्तानचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज बाबर आझमने रविवारी (१३ नोव्हेंबर) इंग्लंडविरुद्ध आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात लाजिरवाणा विक्रम केला. ११४.२९ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणाऱ्या आझमने २८ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने ३२ धावांची खेळी केली.

हेही वाचा – PAK vs ENG Final: मोहम्मद रिझवानला क्लीन बोल्ड करत सॅम करणने मोडला १२ वर्षापूर्वीचा जुना विक्रम

बाबर आझमने टी-२० विश्वचषक २०२२ च्या ७ डावात ९३.२३ च्या स्ट्राइक रेटने एका अर्धशतकाच्या जोरावर एकूण १२४ धावा केल्या, त्याच्या बॅटमधून फक्त १३ चौकार आले. परंतु संपूर्ण स्पर्धेत त्याला एकही षटकार मारता आला नाही. आज या टी-२० विश्वचषकात तो एकही षटकार न मारता सर्वाधिक चेंडू खेळणारा खेळाडू ठरला आहे. त्याने १३३ चेंडू खेळले आणि त्याला एकही षटकार मारता आला नाही. यादरम्यान त्याने ६२ डॉट चेंडू खेळले.

या यादीत त्याने झिम्बाब्वेच्या क्रेग एर्विनला मागे सोडले, जो १२५ चेंडूंचा सामना करत ७ डावात केवळ ११२ धावाच करू शकला आणि एकही षटकार मारला नाही.