BCCI Rahul Dravid Emotional Speech Video Share : जेव्हा भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून ही ट्रॉफी जिंकली होती. या विजयानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू अश्रूंमधून आनंद व्यक्त करताना दिसले, तर विश्वचषक ट्रॉफी हातात घेतल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही पहिल्यांदाच आपला आनंद पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने व्यक्त केला. आता बीसीसीआयने द्रविड यांच्या ड्रेसिंग रूममधील भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या भावना स्पष्टपणे दिसत आहेत.

राहुल द्रविड आपल्या भाषणात काय म्हणाले?

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा हा शेवटचा सामना होता. त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित असलेल्या सर्व भारतीय खेळाडूंसमोर राहुल द्रविड म्हणाले की, “आज मी माझ्या भावना शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मला या अद्भुत प्रवासाचा एक भाग बनण्याची संधी दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. मला वाटतं तुम्हा सगळ्यांना हा क्षण नेहमी लक्षात राहील. तुमच्या कारकिर्दीत तुम्ही किती धावा केल्या, किती विकेट घेतल्या किंवा इतर गोष्टी तुम्हाला कधीच आठवणार नाहीत, पण असे क्षण तुम्हाला नेहमी आठवतील. त्यामुळे त्याचा पुरेपूर आनंद घ्या.”

आपल्या सर्वांच्या मेहनतीचा देशाला अभिमान –

राहुल द्रविड पुढे भारतीय संघाचे कौतुक करताना म्हणाले, “आज मला तुमचा खूप अभिमान आहे. आम्ही एक संघ म्हणून ज्या प्रकारे काम केले, त्यात काही निराशाजनक क्षणांचा समावेश आहे. जिथे आपण ट्रॉफीच्या अगदी जवळ आलो पण अंतिम फेरीत पोहोचू शकलो नाही. आज, सपोर्ट स्टाफसह आपण सर्वांनी घेतलेल्या मेहनतीचा देशाला अभिमान आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांनीही असला पाहिजे.”

हेही वाचा – Team India : विराट कोहलीने पंतप्रधानांचे मानले आभार; म्हणाला, “आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुम्ही मला नेहमीच…”,

द्रविड यांनी आपल्या भाषणात रोहितचा उल्लेख केला –

राहुल द्रविड यांनी आपल्या भाषणात एका गोष्टीचाही उल्लेख केला होता ज्यामध्ये रोहित शर्माने त्यांना टी-२० विश्वचषक २०२४ पर्यंत प्रशिक्षकाच्या भूमिकेत राहण्यास विनंती केली होती. द्रविड म्हणाले की, मला रोहितचे आभार मानायचे आहेत, ज्याने मला नोव्हेंबरमध्ये फोन केला आणि टी-२० विश्वचषकापर्यंत प्रशिक्षकपदावर राहण्यास विनंती केली. रोहितसह तुम्हा सर्वांसोबत काम करताना मला आनंद झाला. कारण प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यातील नाते खूप वेगळे असते ज्यात कधी आपले विचार जुळतात तर कधी नाही पण मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. आपण एक संघ म्हणून जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे आपण त्याचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे.”

हेही वाचा – Team India : राहुल द्रविड यांनी पुन्हा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज का केला नाही? बीसीसीआयचे सचिव जय शाहांचा मोठा खुलासा

बीसीसीआयचेही मानले आभार –

यानंतर राहुल द्रविड यांनी आपल्या भाषणात शेवटी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे आभार मानले, ज्यामध्ये ते म्हणाले की, मी बीसीसीआयच्या कार्याचे आभार मानू इच्छितो, ज्यांच्या अद्भूत प्रणालीमुळे आपण सर्वजण अशा प्रकारे पुढे येऊ शकलो, त्यामुळे मी त्यांचाही ऋणी आहे.”