टी२० विश्वचषक २०२२चा अंतिम सामना रविवारी (१३ नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. यामध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) समोरासमोर येणार आहेत. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून दोन्ही संघाच्या खेळाडूंबरोबरच चाहतेही कधी एकदाचा सामना सुरू होतो याची वाट पाहत आहे, मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असणार अशी माहिती हवामान मेलबर्नच्या खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
टी२० विश्वचषक २०२२ या स्पर्धेत पावसामुळे अनेक सामने रद्द झाले आणि अनेक सामन्यांचे निकालही डकवर्थ लुईस नियमानुसार अनिर्णित ठेवावे लागले. आता अंतिम सामन्यातही पाऊस अडथळा ठरू शकतो. आयसीसीने यासाठी आधीच तयारी केली होती आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला होता, परंतु राखीव दिवशी पावसाची शक्यताही खूप जास्त आहे.
या स्पर्धेचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामना सुरू होईल. मात्र, या दिवशी मेलबर्नमध्ये पावसाची ९५ टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत हा सामना वेळेवर सुरू झाला तरी पावसाचा व्यत्यय येणं जवळपास निश्चित आहे. रविवारी सामन्याचा निकाल लागला नाही, तर उर्वरित षटके सोमवारी होतील. मात्र, सोमवारीही पावसाची ९५ टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या दिवसाचा खेळही वाहून गेल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. या स्थितीत पाकिस्तान आणि इंग्लंड संघ संयुक्त विजेते ठरतील. याआधी टी२० विश्वचषकात संयुक्त विजेते कधीच नव्हते.
आयसीसीने फायनलचे नियम बदलले
आयसीसीने अंतिम सामन्यासाठी पावसाशी संबंधित नियम बदलले आहेत. अंतिम सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी दोन्ही डावात किमान १० षटके आवश्यक असतात, तर सामान्य सामन्यांमध्ये, पाऊस पडल्यास एका डावात किमान पाच षटके आवश्यक असतात. पावसाची शक्यता लक्षात घेऊन पहिल्या दिवशी सामना पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू होईल, असा निर्णयही आयसीसीने घेतला आहे.
पिच रिपोर्ट
इंग्लंड किंवा पाकिस्तान, दोनही संघांमध्ये दर्जेदार लेग स्पीन गोलंदाज आहे. शादाब खान आणि आदिल रशीद संघाकरिता फार मोलाची कामगिरी करत आहेत. अंतिम सामन्यात कोणत्या लेग स्पीन गोलंदाजाला यशाचा मार्ग सापडतो यावर संघाचे भवितव्य विसंबून असेल. पावसाळी हवामान कायम राहणार असल्याने मैदान कर्मचाऱ्यांनी फलंदाजीकरिता पोषक खेळपट्टी बनवायचा प्रयत्न केला तरी काही ना काही मदत वेगवान गोलंदाजांना होणार आहेच.