Rohit Sharma yelling on Kuldeep Yadav video viral : टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये, भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या सुपर-८ सामन्यात बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित केले आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करत १९६ धावांचा मोठा पल्ला गाठला. यानंतर बांगलादेशने कुलदीप यादवची फिरकी आणि अर्शदीप सिंग-जसप्रीत बुमराहच्या वेगवान गोलंदाजीपुढे गुडघे टेकले.भारताने हा सामना ५० धावांनी जिंकला. रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सामन्यादरम्यान कुलदीप यादववर ओरडताना दिसत आहे.

रोहित शर्मा कुलदीपवर ओरडतानाचा व्हिडीओ व्हायरल –

वास्तविक, बांगलादेश संघ १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ९८ धावांवर शाकिब अल हसनच्या रूपाने चौथी विकेट गमावली. ज्याला कुलदीप यादवने बाद केले. यानंतर महमुदुल्लाह फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा कुलदीपला त्याच्याविरुद्ध क्षेत्ररक्षणात काही बदल करायचे होते, त्यामुळे त्यावेळी स्लिपमध्ये उभा असलेला कर्णधार रोहित शर्माने त्याला तसे करण्यापासून रोखले. जेव्हा रोहित कुलदीपला तसे करण्यास नकार देत होता तेव्हा त्यांचे संपूर्ण संभाषण स्टंप माईकवर रेकॉर्ड झाले. रोहित शर्मा म्हणाला, “क्या कर रहा है यार, खेलने दे ना. अभी अभी आया है आड़ा मारने दे ना. एक अभी गया आड़ा मार के, इसको भी मारने दे ना.” आता या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादवच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. त्याने संघासाठी सर्वाधिक ३ विकेट्स घेत बांगलादेश संघाची बॅटींग ऑर्डर उद्ध्वस्त केली. कुलदीपने तांझिद हसन, तौहीद हृदय आणि शाकिब अल हसन यांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याच वेळी, हार्दिक पंड्याने अगोदर फलंदाजीत दमदार प्रदर्शन केल्यानंतर गोलंदाजीतही आपले योगदान दिले. त्याने एक विकेट घेतली. त्याचबरोबर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने २-२ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – VIDEO : पॅट कमिन्सने रचला इतिहास! टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिलाच गोलंदाज

भारतीय फलंदाजांनी दाखवून दिली आपली ताकद –

या सामन्यात टीम इंडियाकडून उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली. सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पहिल्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली होती. रोहित (२३ धावा) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत गेला आणि झेलबाद झाला. विराट कोहली नक्कीच फॉर्ममध्ये दिसत होता, पण तो ३७ धावांवर हसन शाकिबच्या गोलंदाजीवर बाद झाला. प्रत्येक सामन्याप्रमाणेच पंतने येताच मोठे फटके मारायला सुरुवात केली, पण मोठी खेळी खेळता आली नाही. ३६ धावा करून पंत रिशाद हुसेनचा बळी ठरला. हार्दिक पंड्याने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने २७ चेंडूत ५० धावा केल्या, ज्यात त्याने ४ चौकार आणि ३ षटकारही ठोकले. शिवम दुबेने २४ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले.