Rohit Sharma didn’t want to retire video : टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले. १७ वर्षांनंतर टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठीही हा विश्वचषक शेवटचा होता. फायनल जिंकल्यानंतर प्रथम विराट कोहली आणि नंतर रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माला निवृत्ती घेण्याची इच्छा नव्हती, तरी त्याने निवृत्ती का घेतली? त्याचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित म्हणाला की, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती होणण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही, तरीही तो म्हणाला की तो आयपीएल खेळत राहील. तो म्हणाला, “मी भविष्याचा विचार करुन असे निर्णय घेत नाही. आतून मला जे चांगले वाटते ते मी करतो. मी भविष्याचा फारसा विचार करत नाही. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक झाल्यानंतरही मी हा विश्वचषक खेळणार की नाही याचा विचार केला नव्हता.”

रोहित शर्माला निवृत्ती घ्यायची नव्हती –

रोहित शर्मा पुढे म्हणाला, “मी टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेईन, असा विचार केला नव्हता. पण परिस्थिती अशी आली की हा निर्णय घ्यावा लागेल.” एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला तेव्हा रोहित शर्माही त्या संघाचा सदस्य होता. तेव्हापासून आतापर्यंत रोहित शर्मा प्रत्येक टी-२० विश्वचषक खेळला आहे, पण चॅम्पियन होऊ शकला नाही. पण आता तब्बल ११ वर्षांनंतर त्याला हा दिवस पाहण्याची संधी मिळाली आहे. टी-२० विश्वचषक दोनदा जिंकणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी तो केवळ खेळाडू म्हणून खेळला होता, मात्र यावेळी त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विश्वचषक जिंकला आहे.

हेही वाचा – Team India : राहुल द्रविड यांनी पुन्हा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज का केला नाही? बीसीसीआयचे सचिव जय शाहांचा मोठा खुलासा

संपूर्ण स्पर्धेत रोहितने शानदार फलंदाजी केली –

या टी-२० विश्वचषकात रोहित शर्माने आपल्या बॅटने दाखवलेली चमक पुढील अनेक वर्षे स्मरणात राहील. होय, ही दुसरी बाब आहे की आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये त्याची बॅट फारशी तळपली नाही, पण उपांत्य फेरीत आणि त्याआधी कांगारू संघाविरुद्ध त्याच्या बॅटने आग ओकली होती. आज जेव्हा रोहितची बॅट चालली नाही तेव्हा त्याचा साथीदार विराट कोहलीने त्याची पोकळी भरून काढली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. चॅम्पियन बनल्यानंतर विराट कोहलीने स्पष्टपणे जाहीर केले की हा केवळ त्याचा शेवटचा टी-२० विश्वचषक नाही तर शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आहे. म्हणजेच विराट कोहलीने आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करताना दिसणार नाही.

हेही वाचा – Team India : बेरिल चक्रीवादळमुळे टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली, मायदेशी कधी परतणार? जाणून घ्या अपडेट

रोहित-विराट आणि जडेजा निवृत्त –

टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. मात्र, या खेळाडूंच्या निवृत्तीनंतर चाहत्यांना निश्चितच धक्का बसला आहे. हे तिन्ही खेळाडू टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅट खेळत होते. मात्र, आता रोहित-विराट आणि जडेजा फक्त एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहेत.