Sourav Ganguly on Virat Kohli Form Ahead of T20 WC Final: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये टीम इंडियाचा अंतिम सामना आज २९ जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. विराट कोहलीचा फॉर्म रोहित शर्मासह भारतीय चाहत्यांसाठी चिंतेचा विषय आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केल्यानंतर रोहित शर्माने कोहलीच्या फॉर्मवर मोठे वक्तव्य करत विराटने आपली सर्वाेत्तम खेळी फायनलसाठी राखून ठेवली असेल, असे म्हणत त्याला पाठिंबा दिला. तर आता सौरव गांगुलीनेही विराट कोहलीच्या फॉर्मवर मोठे वक्तव्य करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा – IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

यंदाच्या टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीपासून विराट कोहली रोहित शर्मासोबत भारतीय संघासाठी सलामीसाठी उतरत ​​आहे. दुर्दैवाने, त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे कारण आतापर्यंत तो ७ डावात केवळ ७५ धावा करू शकला आहे, ज्यामध्ये त्याची सरासरी ११ पेक्षा कमी आहे. कोहलीला ७ डावांपैकी ५ वेळा दुहेरी आकडाही गाठता आला नाही. यावर आता गांगुलीने विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले.

हेही वाचा – India vs South Africa Final: नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी की फलंदाजी निवडणार? कशी असणार दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

आयसीसी टूर्नामेंटच्या इतिहासातील तिसऱ्या अंतिम फेरीत खेळण्यापूर्वी कोहलीचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय असल्याची चर्चा आहे. पण गांगुलीने त्याच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देत २०२३ मधील एकदिवसीय विश्वचषकातील त्याच्या कामगिरीची चाहत्यांना आठवण करून दिली. गांगुली विराटबद्दल सांगताना म्हणाले, “विराट कोहलीबद्दल तर बोलूच नका,” गांगुलीने पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले. “विराट हा सार्वकालीन महान खेळाडू आहे. विराट कोहलीने सलामीसाठीचं उतरलं पाहिजे. सात महिन्यांपूर्वीच त्याने ७०० धावा करत विश्वचषकात मोठी कामगिरी केली. तोही माणूस आहे. कधी कधी तो अपयशीही होऊ शकतो आणि तुम्हाला ते स्वीकारावे लागेल.”

“तेंडुलकर, द्रविड, कोहली यासारखे खेळाडू युवा पिढीसाठी चालतंबोलतं विद्यापीठच आहेत. तीन-चार सामने त्यांना साधारण खेळाडू बनवू शकत नाहीत. फायनलमध्येही त्याला तितकाच पाठिंबा दिला पाहिजे,” गांगुली म्हणाला.

हेही वाचा – IND vs ENG: भारताच्या विजयानंतर रोहितच्या डोळ्यात तरळले विजयाश्रू, विराट कोहलीने साधला हिटमॅनशी संवाद; VIDEO व्हायरल

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना आज बार्बाडोस येथे भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. भारतीय संघ आयसीसी टूर्नामेंटचे जेतेपद पटकावत ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल तर दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-२० विश्वचषकाचे पहिले जेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्न करेल.