India vs England, T20 World Cup 2024 Semi Final : टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने इंग्लंडवर मात करत अंतिम फेरीत धडक दिली आहे. या सामन्यात भारताच्या फिरकीपटूंनी जबरदस्त गोलंदाजी करत इंग्लंडचं कंबरडं मोडलं. जॉस बटलर, हॅरी ब्रूक व जोफ्रा आर्चर वगळता एकाही इंग्लिश फलंदाजाला भारतीय गोलंदाजांसमोर फार काळ मैदानावर उभं राहता आलं नाही. अक्षर पटेल (३ बळी) आणि कुलदीप यादव (३ बळी) या दोन्ही फिरकीपटूंनी भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या भागीदारीमुळे भारत एक चांगली धावसंख्या उभारू शकला होता. इंग्लंडवर भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला आणि या विजयासह भारताने १० वर्षांनंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. यापूर्वी २०१४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. त्या सामन्यात श्रीलंकेने भारतावर सहा गडी राखून मात करत विश्वचषक उंचावला होता.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत ७ गड्यांच्या बदल्यात १७१ धावा जमवल्या होत्या. यादरम्यान रोहित शर्माने ३९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावा फटकावल्या तर, सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूत ४७ धावांचं योगदान दिलं. हार्दिक पांड्यानेही १३ चेंडूत २३ धावा केल्या. त्याचवेळी रवींद्र जडेजाने १७ धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर, १७२ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाला केवळ १०३ दावांपर्यंत मजल मारता आली आणि भारताने इंग्लंडवर ६८ धावांनी मात केली.

या विजयानंतर समालोचकांशी बातचीत करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “हा विजय खूप समाधान देणारा आहे. एक संघ म्हणून आम्ही खूप मेहनत केली आणि सर्वांनी त्यांचं पूर्ण योगदान दिलं. सर्व गोष्टी जुळून आल्या होत्या. पाऊस आणि इतर कारणांमुळे परिस्थिती खूप आव्हानात्मक होती. परंतु, गोलंदाज आणि फलंदाजांनी जुळवून घेतल्यास सगळं काही आपल्या योजनेप्रमाणे घडतं.”

“आम्ही फलंदाजी करत असताना एका क्षणी असं वाटलेलं की, आमच्या १४० ते १५० धावा होतील. परंतु, मधल्या षटकांमध्ये सूर्यकुमार आणि मला काही चांगले फटके खेळता आले. त्यामुळे २० ते २५ धावा वाढवण्यास मदत झाली. अशा खेळपट्टीवर १७१ ही खूप चांगली धावसंख्या होती. कारण आमचे गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. अशा खेळपट्टीवर अक्षर आणि कुलदीप एखाद्या बंदुकीसारखे आहेत. दबावाखाली ते शांत होते. पहिल्या डावानंतर आमच्या गप्पा झाल्या. स्टम्प्ससमोर (यष्टी) गोलंदाजी करायची हे ठरलं होतं आणि आमच्या गोलंदाजांनी ती कामगिरी चोख केली.”

हे ही वाचा >> IND vs ENG: भारताच्या विजयानंतर रोहितच्या डोळ्यात तरळले विजयाश्रू, विराट कोहलीने साधला हिटमॅनशी संवाद; VIDEO व्हायरल

रोहित म्हणाला, मी माझ्या मनात एक लक्ष्य निश्चित करतो. मात्र मी ते इतरांना कळू देत नाही. माझ्या सहकाऱ्यांनाही सांगण्याची गरज भासत नाही, कारण तेही उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यात १७१ ही खूप चांगली धावसंख्या उभारली होती. तसेच या खेळपट्टीवर फिरकीपटूंविरोधात मोठे फटके खेळणं अवघड होतं.”