भारतीय क्रिकेट संघाने ट्वेन्टी२० वर्ल्डकप मोहिमेसाठी अभ्यास विजयाने सुरू केला. अमेरिकेतील न्यूयॉर्क नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथे झालेल्या लढतीत भारतीय संघाने बांगलादेशवर ६० धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने दिलेलं १८३ धावांचं आव्हान बांगलादेशला पेलवलं नाही. त्यांनी १२२ धावाच केल्या.

आयपीएल स्पर्धेनंतर आठवडाभराच्या आतच भारतीय खेळाडू आता राष्ट्रीय कर्तव्यावर रुजू झाले आहेत. व्यग्र वेळापत्रकामुळे भारतीय संघ वर्ल्डकपआधी हा एकमेव सामना खेळणार आहे. खेळपट्टी, वातावरण यांचा अभ्यास करुन घेत भारताने वर्ल्डकपसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितच्या बरोबरीने यशस्वी जैस्वाल सलामीला उतरेल अशी चाहत्यांना अपेक्षा असताना संजू सॅमसन सलामीला आला. शोरिफुल इस्लामने दुसऱ्याच षटकात संजूला तंबूत परतावलं. त्याला एक धावच करता आली. संजूच्या जागी ऋषभ पंत मैदानात उतरला. पारंपरिक शैलीला छेद देणाऱ्या शैलीसह खेळणाऱ्या ऋषभने अपघातातून पूर्णत: सावरल्याचं दाखवून दिलं. रोहित-ऋषभने दुसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. पूलच्या फटक्यासह षटकार लगावणाऱ्या रोहितने आपले इरादे स्पष्ट केलं. महमदुल्लाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा रोहितचा प्रयत्न रिशाद हुसेनच्या हातात जाऊन विसावला. रोहितने १९ चेंडूत २३ धावा केल्या.

रोहितच्या जागी आलेल्या सूर्यकुमारने ऋषभला चांगली साथ देत तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागादारी केली. निवृत्त होण्यापूर्वी ऋषभने ३२ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकरांसह ५३ धावांची खणखणीत खेळी केली. टोलेजंग फटकेबाजीसाठी प्रसिद्ध शिवम दुबेला जीवदान मिळालं पण त्याला याचा फायदा उठवता आला नाही. मेहदी हसनने त्याला बाद केलं. शिवमने १४ धावा केल्या.

आयपीएल स्पर्धेदरम्यान हार्दिकच्या फॉर्मसंदर्भात शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या. फटकेबाजी विसरलो नसल्याचं हार्दिकने सिद्ध केलं. त्याने २३ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ४० धावांची खेळी केली. सूर्यकुमारने १८ चेंडूत ४ चौकारांसह ३१ धावा केल्या. भारताने २० षटकात १८२ धावांची मजल मारली. बांगलादेशकडून मेहदी हसन, शोरिफुल, महमदुल्ला, तन्वीर इस्लाम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्शदीपने पहिल्याच षटकात सौम्या सरकारला भोपळाही फोडू दिला नाही. पुढच्याच षटकात अर्शदीपनेच जोरदार फटकेबाजीसाठी प्रसिद्ध लिट्टनला माघारी परतावलं. त्याने ६ धावा केल्या. मोहम्मद सिराजने बांगलादेशचा कर्णधार नजमुल होसेन शंटोला भोपळाही फोडू दिला नाही. सिराजला पूल करण्याचा शंटोचा प्रयत्न फसला आणि चेंडू हार्दिकच्या हातात जाऊन विसावला. अक्षर पटेलने तौहिद हृदयला स्थिरावून दिलं नाही. त्याने १३ धावा केल्या. सलामीवीर तांझिड हसन हार्दिक पंड्याची शिकार ठरला. ४१/५ अशी बांगलादेशची घसरगुंडी उडाली. पण यानंतर शकीब अल हसन आणि महमदुल्ला या अनुभवी जोडीने डाव सावरला. या जोडीने सहाव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. महमदुल्लाने ४० धावांवर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. पाठोपाठ शकीब बाद झाला. त्याने २८ चेंडूत ४० धावांची खेळी केली. शकीब बाद झाल्यावर बांगलादेशची पुन्हा घसरगुंडी उडाली. बांगलादेशने १२२ धावा केल्या आणि भारतीय संघाने ६० धावांनी विजय मिळवला.

भारतातर्फे अर्शदीप आणि शिवमने प्रत्येकी २ तर बुमराह, सिराज, हार्दिक, अक्षर यांनी प्रत्येकी एक विकेट पटकावली.

विराट कोहलीला विश्रांती
काही तासांपूर्वीच अमेरिकेत दाखल झालेला विराट कोहली या सामन्यात खेळला नाही. सामन्याआधी विराटने संघाबरोबर सराव केला. मात्र विश्रांतीच्या कारणास्तव या लढतीत तो सहभागी झाला नाही.

दुबेची गोलंदाजी
वेगवान गोलंदाजी करू शकेल असा अष्टपैलू खेळाडू भारतीय संघाला हवा होता. त्या दृष्टिकोनातून शिवम दुबेची संघात निवड करण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धेत शिवमने चेन्नईसाठी खेळताना फारशी गोलंदाजी केली नाही पण त्याची बॅट तळपत राहिली. या लढतीत शिवमला मोठी खेळी करता आली नाही. पण त्याने गोलंदाजी केली. शिवमने ३ षटकात १३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. ऑलराऊंडर म्हणून खेळण्यासाठी सज्ज असल्याचं शिवमने दाखवून दिलं.