IND vs ENG 2nd Semi Final T20 World Cup 2024: भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टी-२० विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे आणि अलीकडच्या काही वर्षांत जगातील अव्वल वेगवान गोलंदाजांमध्ये त्याची गणना केली जाते. अनेक दिग्गज खेळाडू बुमराहच्या कामगिरीने त्याचे कौतुक करत थकत नाहीत. बुमराहने टी-२० वर्ल्डकपमध्ये यंदा आतापर्यंत ११ विकेट घेतल्या आहेत. माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी भारताच्या सेमीफायनलपूर्वी बुमराहवर मोठे वक्तव्य केले आहे. पाहा नेमकं काय म्हणाले.

संपूर्ण स्पर्धेत, बुमराहने केवळ २३ षटकांत ११ विकेट्स घेत संघाला मोक्याच्या क्षणी मदत केली आहे. याहूनही उल्लेखनीय बाब म्हणजे त्याचा इकॉनॉमी रेट ४.०८ आहे, जो की खूपच चांगला आहे. बुमराह सातत्याने विकेट घेत असताना नियंत्रण आणि अचूकता राखण्याची त्याची क्षमता दाखवतो.

हेही वाचा – IND v ENG: “डोकं वापरणंही गरजेचं…”, इंझमाम उल हकच्या बॉल टेंपरिंगच्या आरोपावर रोहित शर्मा वैतागला, म्हणाला; “आम्ही काय…”

कपिल देव यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘बुमराह माझ्यापेक्षा १००० पटीने चांगला गोलंदाज आहे. ही तरुण मुलं आमच्यापेक्षा खूप चांगली आहेत. आमच्याकडे खूप अनुभव होता. पण ही मुलं अधिक चांगली आहेत. उत्कृष्ट आहेत. कष्टाळू आहेत आणि अधिक फिट पण आहेत. बुमराह, ज्याला आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रमुख वेगवान गोलंदाज मानले जाते, त्याने २६ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, त्याने प्रति षटकात तीन धावांपेक्षा प्रभावी इकॉनॉमी रेटने १५९ विकेट्स घेतले आहेत. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये, त्याने ८९ सामन्यांमध्ये १४९ विकेट्स घेतल्या आहेत, तर टी-२० मध्ये त्याची ८५ विकेट्स त्याच्या नावे आहेत.

हेही वाचा – “ऑस्ट्रेलियाचा संघ आता…”. रोहित शर्माने एका वाक्यात व्याजासकट बदला घेतला; हिटमॅन स्टाईल उत्तराचा VIDEO व्हायरल

कपिल देव पुढे म्हणाले, “आपण फक्त रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या किंवा कुलदीप यादव यांच्याबद्दलच का बोलत आहोत? प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे. स्पर्धा जिंकणे हे त्यांचे काम आहे. सामना जिंकण्यासाठी कोणत्याही एका खेळाडूची कामगिरी महत्त्वाची असू शकते, परंतु स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे. आपण फक्त बुमराह किंवा अर्शदीपवर अवलंबून राहिलो तर विजय मिळवणं कठीण होईल. संघाबद्दल बोलायला हवे. हे तुम्हाला कोणत्याही एका खेळाडूपेक्षा चांगला दृष्टीकोन देते. एक प्रमुख खेळाडू असू शकतो पण विश्वचषक जिंकण्यासाठी प्रत्येकाला योगदान द्यावे लागेल.”