Ravi Shastri’s criticism of Michael Vaughan : भारतीय संघाने आयसीसी टी-२०२४ च्या विश्वचषकात आपले एकतर्फी वर्चस्व कायम राखत जेतेपद पटकावले. भारतीय संघाने १७ वर्षांनतर दुसऱ्यादा टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. त्याचबरोबर ११ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. यानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. मात्र, असे काही खेळाडू आहेत जे भारताच्या जेतेपदावर खूश नाहीत. कारण या स्पर्धेदरम्यानच इंग्लंडचा माजी खेळाडू मायकेल वॉनने सांगितले होते की, आयसीसीने ही स्पर्धा भारतानुसार आयोजित केली आहे जेणेकरून त्यांना कोणतीही अडचण येऊ नये. यावर आता भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
रवी शास्त्री यांनी मायकल वॉनला दिले प्रत्युत्तर –
रवी शास्त्री यांनी टाइम्स नाऊशी बोलताना मायकल वॉनला विचारपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, ‘मायकल वॉन त्याला जे हवे ते बोलू शकतो. कारण त्याच्या बोलण्याने भारतात कोणालाच काहीच फरक पडत नाही. त्याला इंग्लंड संघ सांभाळू द्या. त्याने इंग्लंडला भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीतील पराभवावर सल्ला दिला पाहिजे. कारण भारताने आता ट्रॉफी जिंकली आहे. मला माहित आहे की इंग्लंडने दोन वेळा आयसीसीचे जेतेपद पटकावले आहे, पण भारताने चार वेळा पटकावले आहे. मला वाटत नाही की, मायकेलने कधी ट्रॉफी जिंकली असेल. त्यामुळे बोलण्यापूर्वी दोनदा विचार करावा. तो माझा मित्र आहे. पण त्याला हे माझे उत्तर आहे.’
मायकल वॉनने केला होता आरोप?
एका कार्यक्रमादरम्यान मायकल वॉन म्हणाला होता, “खरंच, ही भारताची स्पर्धा आहे. त्यांना पाहिजे तेव्हा ते खेळू शकतात. त्यांना माहित असते की त्यांची उपांत्य फेरी कुठे होणार आहे. त्यांनी त्यांचे सर्व सामने सकाळी खेळले आहेत जेणेकरून लोकांना ते रात्री भारतात टीव्हीवर पाहता येतील. क्रिकेट जगतात पैशाची मोठी भूमिका असते हे मला समजते. मी द्विपक्षीय मालिकेची गोष्ट समजू शकतो, परंतु मला वाटते की जेव्हा तुम्ही विश्वचषकात प्रवेश करता, तेव्हा आयसीसीने सर्वांशी थोडे अधिक निष्पक्ष असले पाहिजे. ते फक्त भारतासाठी नसावे, कारण ते जास्त पैसे मिळवून देतात.”
मायकल वॉनच्या या विधानाला हरभजन सिंगनेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. भज्जीने पोस्टमध्ये लिहिले, “तुम्हाला वाटते की गयाना हे भारतासाठी चांगले ठिकाण आहे? दोन्ही संघ एकाच मैदानावर खेळले. इंग्लंडने नाणेफेक जिंकली त्याचा त्यांना फायदा झाला. भारताने इंग्लंडला प्रत्येक ठिकाणी पराभूत केले आहे. त्यामुळे सत्य स्वीकारा आणि पुढे जा आणि आपला मूर्खपणा स्वतःकडे ठेवा. त्यांनी तर्कशास्त्रानुसार बोलावे, उगीच काहीही बोलून नये.”
© IE Online Media Services (P) Ltd