भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. या विजयाबरोबरच भारताने १० वर्षांचा आयसीसी ट्रॉफिचा दुष्काळ संपवला आहे. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी-२० चॅम्पियन ठरला आहे. दरम्यान, या विजयानंतर आता भारतीय संघाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. पंतप्रधान मोदी यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन करत व्हिडीओ संदेश जारी केला.

हेही वाचा – IND vs SA Final: किंग कोहलीने रोहितचं म्हणणं खरं करून दाखवलं! विराटने संयमी अर्धशतकास…

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

“भारतीय संघाला मिळालेल्या भव्य विजयासाठी मी संपूर्ण देशवासियांकडून त्यांचं अभिनंदन करतो. १४० कोटी देशातील जनतेला त्यांच्यावर गर्व आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. भारतीय संघाने विश्वचषक जिंकण्याबरोबरच संपूर्ण देशवासियांची मने जिंकली आहेत”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली. तसेच “हा विश्वचषक एका विशेष कारणामुळेही लक्षात ठेवला जाईल. ते म्हणजे या स्पर्धेत इतके सगळे देश सहभागी झाले होते. मात्र, भारतीय संघाचा एकाही सामन्यात पराभव झाला नाही. संपूर्ण स्पर्धेत अजेय राहणं ही छोटी गोष्ट नाही”, असेही ते म्हणाले.

राहुल गांधींकडूनही भारतीय संघाचं कौतुक

नरेंद्र मोदी यांच्याशिवाय लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी या विजयाबद्दल भारतीय संघाचे कौतुक केलं. विश्वचषकातील विजयाबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन! सूर्या तू घेतलेला झेल अप्रतिम होता. रोहित, हा विजय तुझ्या नेतृत्वाचा दाखला आहे. राहुल, मला माहिती आहे की टीम इंडिया तुमच्या मार्गदर्शनाला मुकणार आहे., अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

दरम्यान, शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्न साकारले. सामन्यातील अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने दमदार गोलंदाजी केली. भारताला विजयासाठी ६ षटकांत १६ धावांची गरज होती. तर मैदानात मिलर आणि केशव महाराजची जोडी होती. हार्दिकने फुलटॉस चेंडू टाकला जो मिलरने जोरदार फटका लगावला पण सीमारेषेवर उभा असलेल्या सूर्याने आश्चर्यकारक झेल टिपला आणि भारताच्या दिशेने सामना फिरवला.

हेही वाचा – T20 WC 2024: भारत ठरला विश्वविजेता, सूर्यकुमार यादवचा झेल आणि जसप्रीत बुमराहचे षटक ठरला टर्निंग पॉईंट

तत्पूर्वी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत आठ गडी गमावून १६९ धावा करता आल्या. या विजयासह भारताचा ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे.