Rohit Sharma Indian Flag Barbaos : भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये नवा इतिहास रचला आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करुन विजेतेपदावर आपले नाव कोरले. भारताने अतिशय आव्हानात्मक पद्धतीने विजय मिळवला. कारण एकवेळी अशी आली की, सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने जात असल्याचे दिसत होते. पण हार्दिक पांड्या, सुर्यकुमार यादव आणि बुमराहच्या विशेष कामगिरीमुळे भारतीय संघाला विजेतेपद पटकावता आले, संघाच्या विजेतेपदानंतर कर्णधार रोहित शर्माने बीबीसीआयचे सचिव जय शाह आणि संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्यासह बार्बाडोसच्या मातीत देशाचा ध्वज रोवला. हा प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाचा क्षण होता.
जय शाहांची इच्छा केली पूर्ण
टी-20 विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघाची घोषणा होण्यापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका कार्यक्रमात एक इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणजे “आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बार्बाडोसमध्ये भारताचा झेंडा फडकवेल”. अखेर ती इच्छा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने पूर्ण केली, तसेच बार्बाडोसच्या मातीत भारताचा ध्वज रोवला. यावेळी जय शाह यांच्यासह प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता, याचे काही फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया व्हायरल
भारताने दक्षिण आफ्रिकेला अशाप्रकारे मात देत मिळवला विजय
अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. पॉवर प्लेमध्येच भारताला ३ मोठे धक्के बसले. गेल्या दोन सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी करणाऱ्या कर्णधार रोहित शर्माला केवळ ९ धावा करता आल्या. त्याचवेळी ऋषभ पंतला खातेही उघडता आले नाही, तर सूर्यकुमार यादव केवळ ९ धावा करुन बाद झाला. विराट कोहली (७६) आणि अक्षर पटेल(४७) यांनी अवघड वाटणारा डाव सांभाळला, शेवटी शिवम दुबे (२७) यानेही तुफान फटकेबाजी केली, अशाप्रकारे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका संघाला १७७ धावांचे लक्ष्य दिले.
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीला २ विकेट गमावल्या, परंतु नंतर त्यांच्या फलंदाजांनी चांगलाच डाव चालवला, यात हेनरिक क्लासेनने ५२ धावा करताच भारताचा पराभव निश्चित वाटत होता पण नंतर तोही बाद होताच भारतीय संघाने पुनरागमन केले, शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १६ धावांची गरज होती, पण हार्दिक पांड्याने केवळ ८ धावा देत भारताला सामना मिळवून दिला. अशाप्रकारे टीम इंडियाने अजिंक्य राहून टी-२० वर्ल्ड कप २०२४ ची ट्रॉफी जिंकली.
© IE Online Media Services (P) Ltd