Rohit Sharma First Reaction On T20 World Cup 2024 India Victory: भारताने २९ जूनला बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत भारताला टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर खेळाडूंनी ही मैदानावर एकच जल्लोष केला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने गेल्या वर्षभरात तीन आयसीसी टूर्नामेंटच्या अंतिम फेरी गाठल्या. पण अखेरीस टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत विजय मिळवण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने बार्बाडोसच्या खेळपट्टीवरील मातीची चव चाखली आणि नतमस्तक झाला, ज्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.

हेही वाचा – T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण

रोहितने बार्बाडोसच्या पिचवरील मातीची चव का चाखली?

आयसीसीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित खेळपट्टीवरील माती चाखताना आणि केन्सिंग्टन ओव्हलवरील खेळीपट्टीला नमस्कार करताना दिसत आहे. भारताच्या कर्णधाराने आता त्याच्या खेळपट्टीवरील माती तोंडी का लावली याचे कारण सांगितले आहे. कर्णधाराच्या फोटोशूटनंतर एका मुलाखतीदरम्यान रोहितने सांगितले की, त्या मैदानाने संघाला विजय मिळवून दिला आहे आणि तो आयुष्यभर ती खेळपट्टी त्याच्या स्मरणात राहील.

बार्बाडोसच्या खेळपट्टीबद्दल रोहित म्हणाला, “खरं तर, मला नाही वाटतं की मी शब्दात त्याबद्दल सांगू शकेन कारण काहीही स्क्रिप्टेड नव्हतं. वर्ल्डकप जिंकल्यानंतर भावना दाटून आल्या होत्या. त्या क्षणी मला जे जाणवलं ते मी केलं होतं. मी खेळपट्टीजवळ गेलो, कारण त्या खेळपट्टीवर खेळून आम्ही हे जेतेपद पटकावलं. आम्ही त्या विशिष्ट खेळपट्टीवर अंतिम सामना खेळला आणि जिंकलो. ते मैदान आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील, ते क्षण खूप खूप जास्त खास होते. ती खेळपट्टी ते मैदान एक असे ठिकाण होते, जिथे आम्ही आमचं मोठं स्वप्न पूर्ण केलं होतं. त्या खेळपट्टीसमोर नतमस्तक होत त्या मातीच चव घेण्यामागे हीच भावना होती.

हेही वाचा – “तुझ्याकडे थोडावेळ ट्रॉफी असू दे…”, विराटने सांगितली रोहितबरोबरच्या आयकॉनिक फोटोमागची गोष्ट, म्हणाला; भारतासाठी वर्ल्डकप…

भारताच्या कर्णधाराने विश्वचषक जिंकल्यानंतर काय भावना आहेत, याबाबतही सांगितले. अजूनही जे घडलं ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे रोहित म्हणाला. रोहित म्हणाला की सर्व संघासाठी हे एखाद्या स्वप्नासारखे आहे आणि ट्रॉफी मिळवल्याने सर्व जण समाधानी आहेत.

“हो, हे अवास्तविक आहे. मी अजूनही म्हणेन की मला हे खरं वाटतं नाहीय. ट्रॉफी जिंकतानाचा क्षण अद्भुत होता. सामना जिंकल्यापासून अजूनही सगळं स्वप्नवत वाटतंय. असं वाटतंय की प्रत्यक्षात काही घडलंच नाही. पण खरंतर आम्ही वर्ल्ड चॅम्पियन ठरलोय. पण अजूनही काही घडलंच नाही असंच जाणवतंय.

हेही वाचा – VIDEO: दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूचं सूर्याच्या कॅचवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “बाऊंड्री कुशन हललं, पण…”

ही एक वेगळीच भावना आहे. गेले कित्येक वर्ष ती ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पाहिले. एक संघ म्हणून बऱ्याच काळापासून खूप प्रयत्न करत होतो आणि आता ती ट्रॉफी जिंकल्यानंतर आमच्याबरोबर असलेली ची ट्रॉफी पाहून दिलासा मिळाला. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी कठोर परिश्रम घेता आणि शेवटी ती गोष्ट मिळवता तेव्हा खूप दिलासादायक वाटतं, असं रोहित शर्मा म्हणाला.

कॅरेबियन बेटावरील बेरिल वादळाच्या तडाख्यामुळे भारतीय संघ अजूनही बार्बाडोसमध्ये होता. आज संघ बीसीसीआयने उपलब्ध करून दिेलेल्या विशेष विमानाने दिल्लीसाठी रवाना होणार आहे. भारतीय चाहते आणि भारतीय संघातील खेळाडूही मायदेशी या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत.