Rohit Sharma’s Flying Kiss Video Viral After India’s Defeat of England : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. भारतीय संघ काही महिन्यांत तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याआधी टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचली होती. पण दोन्ही फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. मात्र, यावेळी भारताकडे नवा प्रतिस्पर्धी असून चाहत्यांना जेतेपदाची अपेक्षा आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुरुवारी, भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दरम्यान, सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा त्याची पत्नी रितिका सजदेहला ‘फ्लाइंग किस’ देताना दिसत आहे, असं चाहत्यांचे मत आहे. कारण या व्हिडीओतील समोरची व्यक्ती कोण आहे दिसत नाही.

रोहित शर्माचा ‘फ्लाइंग किस’ देतानाचा व्हिडीओ व्हायरल –

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, रोहित शर्मा त्याची पत्नी रितिका सजदेहशी बोलताना दिसत आहे आणि नंतर त्याने फ्लाइंग किस दिल्याचे दिसत आहे. रोहित शर्मासोबत, वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकात इतर काही खेळाडूंच्या पत्नीही त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत. सामन्यादरम्यान रितिका अनेकवेळा संघाला सपोर्ट करताना दिसली.

हेही वाचा – IND vs SA : फायनल आणि राखीव दिवशीही पावसाचं सावट; सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार जेतेपदाचा करंडक?

पावसाने व्यत्यय आणलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने गतविजेत्या इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करून टी-२० क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत तिसऱ्यांदा प्रवेश केला आहे, ज्यामध्ये त्यांचा सामना शनिवारी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या विजयासह भारताने २०२२ मध्ये या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध १० गडी राखून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला. भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १६.४ षटकात १०३ धावांवर गारद झाला.

हेही वाचा – VIDEO : सचिन-रिचर्ड्स, राहुल द्रविड यांच्यानंतर ‘बेस्ट फिल्डर मेडल’ देण्यासाठी भारतीय ड्रेसिंग रुममध्ये पोहोचलं तरी कोण?

भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व ७ सामने जिंकले आहेत. भारताचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेने खेळलेले सर्व ८ सामने जिंकले. अशा स्थितीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्रॉफीची लढत रोमांचक होण्याची शक्यता आहे. प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा संघ कोणत्याही विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतासमोर दिसणार आहे.