Rohit Sharma Statement on India Win: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या सुपर८ मोहिमेची सुरुवात जबरदस्त विजयासह केली आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने ४७ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात भारतीय संघाच्या विजयात आयसीसीचा नंबर १ फलंदाज सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी केली, तर गोलंदाजीत जबरदस्त फॉर्मात असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा आपला आपली भेदक गोलंदाजी करताना दिसला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातील विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने तिन्ही खेळाडूंचे कौतुक केले, तर त्याने असेही म्हटले की, संघातील प्रत्येकाला त्यांची भूमिका चांगलीच ठाऊक आहे आणि आम्हाला तेच मैदानावर पाहायला मिळत आहे.

भारताच्या विजयानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर सांगितले की, “गेल्या दोन वर्षांपासून आम्ही इथे येऊन काही टी-२० सामने खेळलो. आम्ही नियोजन चांगल्याप्रकारे केले. इथे ज्या प्रकारची परिस्थिती आहे त्यानुसार आम्ही स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आमची उत्कृष्ट गोलंदाजी हा सामना जिंकवून देईल हे आम्हाला माहीत होते. प्रत्येकाने येऊन आपापली जबाबदारी पार पाडली आणि हीच गोष्ट आहे ज्याबद्दल आपण अनेकदा बोलतो.”

हेही वाचा – T20 WC 2024: टीम इंडियाने पार केली ‘अफगाण खिंड’; सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी ठरली निर्णायक

अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात एकेकाळी भारतीय संघाला १५० धावा करणे फार कठीण वाटत होते, परंतु सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्यात ५व्या विकेटसाठी केलेली ३७ चेंडूत ६० धावांची भागीदारी भारतीय संघाला १८१ धावांपर्यंत पोहोचवण्यात मदत करणारी ठरला. सूर्या आणि हार्दिकच्या भागीदारीसोबतच रोहित बुमराहबद्दल सांगताना म्हणाला, “सूर्या आणि हार्दिकची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. बुमराह संघासाठी काय करू शकतो हे आपल्याला माहीत आहे. त्याचा हुशारीने वापर करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. तो एक अशा खेळाडू आहे जो जबाबदारी घेण्यासही तयार असतो, तो कोणत्याही परिस्थितीत खेळला तरी जबाबदारी घ्यायला नेहमीच तयार असतो.”

हेही वाचा – IND vs AFG सामन्यात भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? BCCI ने सांगितलं नेमकं कारण

या सामन्यात टीम इंडिया तीन आघाडीच्या फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरली होती, ज्याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, “मी येथील परिस्थिती आणि विरोधी संघाचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन फिरकीपटू ठेवावेत असे आम्हाला वाटले, म्हणून आम्ही तेच केले. भविष्यातील सामन्यांमध्ये तीन वेगवान गोलंदाज खेळवले जावेत, असे वाटत असेल, तर त्यासाठीही आम्ही तयार आहोत.”