Rohit Sharma: भारताने ११ वर्षांची प्रतीक्षा संपवत अत्यंत रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला अहमदाबादमधील अधुरे स्वप्न अखेर वेस्ट इंडिजमध्ये पूर्ण झाले, तेव्हा रोहित शर्माच्या संघासह टीव्हीसमोर बसलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांचे डोळेही पाणावले. या आयसीसी विजेतेपदासाठी ११ वर्ष वाट पाहावी लागली. या जेतेपदानंतर भारताचे दोन हिरे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० फॉरमॅटमला अलविदा केलं आहे.

रोहित शर्माने निवृत्तीचा विचार आधीच केला असावा. तो फक्त भारत चॅम्पियन होण्याची वाट पाहत होता, पण त्याआधीच विराटच्या वक्तव्याने खळबळ उडवली. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी रोमहर्षक विजय मिळविल्यानंतर रोहित शर्माने अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधला, तेव्हा त्याने सांगितले की आदल्या रात्री तो बिलकुल झोपला नव्हता.

हेही वाचा – T20 World Cup Prize Money: भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकताच कोट्यवधींचा वर्षाव, दक्षिण आफ्रिकालाही मिळाली मोठी बक्षिसाची रक्कम

भारताच्या वर्ल्डकप विजयानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा भावूक झाला आणि म्हणाला की त्याच्या संघाने केवळ अंतिम फेरीत चांगली कामगिरी केली नाही तर गेली तीन वर्षे त्यासाठी कठोर परिश्रमही केले आहेत. तो म्हणाला, “मला सध्या काय वाटतंय ते मी सांगू शकत नाही. शब्दात सांगता येत नाही. काल रात्री मला झोप येत नव्हती. मला कोणत्याही किंमतीत ही ट्रॉफी जिंकायची होती. गेल्या तीन-चार वर्षांत आम्ही किती मेहनत घेतली हे सांगणे कठीण आहे. ही केवळ आजची गोष्ट नाही, त्यामागे तीन-चार वर्षांची मेहनत आहे.”

हेही वाचा – IND vs SA: सूर्या दादाच्या एका कॅचने फिरवली मॅच! सूर्यकुमारला बेस्ट फिल्डरचं मेडल देताना ड्रेसिंग रूममध्ये…; पाहा VIDEO

सामना जिंकल्यानंतर रोहित म्हणाला, “गेल्या ३-४ वर्षात आम्ही जे काही अनुभवलं ते शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. खरं सांगायचे तर, आम्ही वैयक्तिकरित्या खूप मेहनत केली आहे आणि एक संघ म्हणून, आज इथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि हा सामना जिंकण्यासाठी पडद्यामागे बरीच मेहनत आहे. हे आम्ही आज नाही तर गेली ३-४ वर्षे करत आहोत. पण आज आमच्या बाजूने निकाल लागला. आम्ही याआधी अनेक दबाव असलेले खेळ खेळलो आहोत. पण खेळाडूंना काय करावे लागेल हे समजते.”

हेही वाचा – IND vs SA Final: रोहित शर्माने विजयानंतर बार्बाडोसच्या खेळपट्टीवरील मातीची चव का चाखली? VIDEO मध्ये पाहा कॅप्टनने नेमकं काय केलं?

“दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने सामना गेल्याचे दिसत असतानाही आम्ही एक संघ म्हणून आणि सर्व खेळाडूंनी एकत्र येऊन कामगिरी केली. एकूणच, एक संघ म्हणून, मैदानावर एक गट म्हणून, आम्हाला ते जेतेपद हवे होते. आम्हाला ते जिंकायचे होते. अशाप्रकारे ही स्पर्धा जिंकण्यासाठी पडद्यामागे खूप काही घडतं असतं, खूप मेहनत करावी लागते. मी ज्या खेळाडूंसोबत खेळलो त्यांचा आणि व्यवस्थापनाचा मला खूप अभिमान आहे, ज्यांनी आम्हाला खेळण्याचे स्वातंत्र्य दिले आणि आम्हा सर्वांवर विश्वास दाखवला.”

संघ व्यवस्थापनाचे आभार मानताना रोहित शर्मा म्हणाला, “या सगळ्याची सुरुवात व्यवस्थापन, प्रशिक्षक, कर्णधार यांच्यापासून होते आणि मग खेळाडू मैदानावर जाऊन खेळतात. संपूर्ण स्पर्धेत, मला वाटते की आम्ही चमकदार कामगिरी केली आणि याचे श्रेय व्यवस्थापनालाही जाते. विराटच्या फॉर्मबद्दल कोणालाही कधीच शंका नव्हती. त्याच्यात किती क्षमता आहे हे आम्हाला माहित आहे, जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा मोठे खेळाडू उभे राहतात. विराटने आज संघासाठी तेच केलं, तो एका टोकाला पाय रोवून घट्ट उभा होता, आम्हाला एखाद्या खेळाडूने जास्त वेळ मैदानावर राहत फलंदाजी करावी असे वाटतं होते. नवीन खेळाडू येऊन थेट खेळू शकेल अशी ही विकेट नव्हती.”

विराटबद्दल सांगताना रोहित शर्मा पुढे म्हणाला, “विराटचा अनुभव इथे कामी आला. मी त्यांच्यापैकी एक आहे ज्यांनी त्याला इतकी वर्षे खेळताना पाहिले आहे, पण तो हे कसे करतो हे देखील मला माहित नाही. हा एक मास्टरक्लास आहे. तो खूप आत्मविश्वासी खेळाडू आहे. हार्दिकने शेवटचे षटक टाकत चमकदार कामगिरी केली. न्यूयॉर्क ते बार्बाडोस पर्यंत चाहते आम्हाला पाठिंबा देत होते ही विलक्षण बाब आहे आणि भारतातील सर्व चाहते, रात्र झाली आहे पण मला खात्री आहे की हा विजय आणि हे सर्व पाहण्यासाठी सर्वच जण अजून जागे असतील. आमच्याप्रमाणे तेही या दिवसाची खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत.”

भारताने २२०७ मध्ये पहिला टी-२० विश्वचषक जिंकला आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे शेवटचे ICC विजेतेपद होते. गेल्या वर्षी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाली होती.