Rohit Sharma Gives Beffiting Reply to Inzamam Ul Haq Ball Tempering Allegations: भारतीय संघ आज म्हणजेच २७ जूनला टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना खेळवला जाईल. या स्पर्धेत आतापर्यंत टीम इंडियाने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपली अपराजित विजयी मोहीम सुरू ठेवली आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्याने त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर८ फेरीच्या सामन्यानंतर, पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने आपल्या वक्तव्याद्वारे टीम इंडियाच्या गोलंदाजांवर बॉल टेम्परिंगचे गंभीर आरोप केले होते, ज्यावर आता हिटमॅन रोहित शर्मानेही प्रत्युत्तर दिले आहे. वेस्ट इंडिजमधील खेळपट्टीबद्दल सांगत त्यांची बोलती बंद केली आहे.

हेही वाचा – “भारताने बॉलसह…” पाकिस्तानच्या इंझमाम उल हकचा भारतीय संघावर मोठा आरोप, म्हणाले- “अर्शदीपला १५ व्या षटकात…”

रोहित शर्माला पत्रकार परिषदेत इंझमाम उल हकच्या बॉल टॅम्परिंगच्या आरोपांबद्दल विचारले असता तो म्हणाला, “यावर मी तुम्हाला काय उत्तर देऊ? जर तुम्ही दिवसभरात इथल्या परिस्थितीत सामना खेळलात तर खेळपट्टी खूप कोरडी असते त्यामुळे चेंडू आपोआप रिव्हर्स स्विंग होतो. चेंडू फक्त आमचाच नाही तर सर्व संघ खेळत असतानाचही रिव्हर्स होते. कधी कधी डोकं वापरणंही गरजेचं असतं. वर्ल्डकपचे सामने कुठे खेळवले जात आहेत हेही बघावं लागेल. सामने ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये खेळवले जात नाहीयत. मला इतकंच बोलायचं आहे.”

हेही वाचा – SA vs AFG Semi Final 1 Live: पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत, अफगाणिस्तानवर दणदणीत विजय

इंझमाम उल हकने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर खोटे आरोप केले होते, जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर८ फेरीच्या सामन्यात १५व्या षटकात त्याचे चेंडू रिव्हर्स स्विंग होत होते, ते पाहता इंझमामने हे वक्तव्य केले होते. टीम इंडियाने हा सामना २४ धावांनी जिंकला होता आणि जो सेंट लुसियाच्या मैदानावर खेळला गेला होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर८ मधील अखेरच्या सामन्यात रोहितने ९२ धावांची विस्फोटक खेळी करत सामना पूर्णपणे आपल्या हातात ठेवला होता. इंग्लंडविरुद्धच्या या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाला पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्माकडून स्फोटक खेळीची अपेक्षा आहे. या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.