Rohit Sharma Statement Viral Video: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद पटकावले. दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात पराभव करत भारताने १७ वर्षआंनंतर टी-२० वर्ल्डकप पटकावला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात एकही सामना न गमावता अजिंक्य राहत या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा भारत पहिला संघ ठरला. यानंतर काल म्हणजेच ४ जुलै रोजी वानखेडेवर झालेल्या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा – मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

रोहित शर्मा आणि त्याची स्टंप माईकवरील वाक्य यांचं समीकरणचं मजेशीर आहे. अनेक विविध स्टंप माईकवरील रोहितच्या कमेंट्स या व्हायरल झाल्या आहेत. त्यापैकी सर्वात गाजलेलं वाक्य होतं ते म्हणजे गार्डनमध्ये कोणी फिरलं तर बघा. या वाक्यावरून रोहितला नेहमीच चिडवलं जातं आणि त्यावर रोहितही दिलखुलास उत्तर देत असतो. याच संबंधित एक प्रश्न त्याला वानखेडेवरील कार्यक्रमात विचारला गेला.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमादरम्यान टी-२० विश्वचषक विजयासाठी खेळाडूंचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध गौरव कपूर करत होता. या कार्यक्रमात रोहितशी संवाद साधताना त्याने विचारलं, एकाही सामन्यात कोणताही खेळाडू थोड्या वेळासाठीही गार्डनमध्ये फिरत नव्हता असं म्हणू शकतो का?

हेही वाचा – VIDEO: जगज्जेत्या कर्णधाराचं घरी साजेसं स्वागत; बालपणीच्या मित्रांनी केला सॅल्युट, फुलांनी सजवलं घर

रोहित शर्मा या प्रश्नावर चांगलाच हसू लागला आणि हा प्रश्न ऐकताच चाहत्यांनीही जोरदार आवाज केला. तर सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या यशस्वी जैस्वाल यांचीही हा प्रश्न विचारताच प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. रोहित शर्मा या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला, “मी भाग्यवान आहे की मला असा संघ मिळाला जो कोणत्याही परिस्थितीत संघासाठी कामगिरी करण्यासाठी तयार असतो. केवळ काही जणांची नावं घेणं चुकीचं ठरेल. सर्व खेळाडू आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफचा यात वाटा आहे. गेली ३-४ वर्ष सातत्याने केलेल्या प्रयत्नांचं हे फळ आहे आणि त्यानंतर अशाचप्रकारे आपल्याला खेळायचं आहे हे मनाशी पक्क ठरवलं. संघानेही तशीच कामगिरी केली आणि मला या संघाचा अभिमान आहे.”