Rohit Sharma surpasses MS Dhoni and Babar Azam : टीम इंडिया आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये पोहोचली आहे. गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची कामगिरी या स्पर्धेत आतापर्यंत चांगलीच राहिली आहे. संघाने आतापर्यंत एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली आहे. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचताच रोहित शर्माने एमएस धोनीला एका खास विक्रमात मागे टाकले आहे.

रोहित शर्माने एमएस धोनीला टाकले मागे –

टीम इंडियाने गेल्या काही काळापासून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने सलग तिसऱ्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. याआधी भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. या तीन प्रसंगी भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या हाती राहिली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला तिन्ही फॉरमॅटमध्ये आयसीसी टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत पोहोचवणारा तो भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. एमएस धोनीने टीम इंडियाला तीन वेगवेगळ्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये फायनलमध्ये नेले होते, पण त्यावेळी आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप खेळली गेली नव्हती. अशा परिस्थितीत त्याने संघाला एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटच्या आयसीसी स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत नेले होते.

बाबर आझमलाही टाकले मागे –

रोहित शर्माचा कर्णधार म्हणून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा ४९ वा विजय आहे. यासह टी-२० आंतरराष्ट्रीय सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार बनला आहे. त्याने बाबर आझमचा विक्रम मोडला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने ४८ सामने जिंकले आहेत, मात्र रोहित आता त्याच्या पुढे गेला आहे. यासोबतच युगांडाचा कर्णधार ब्रायन मसाबा ४५ विजयांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2024 च्या ट्रॉफीवर ‘हा’ संघ कोरणार नाव? आधीच करण्यात आलीय भविष्यवाणी; जुनं ट्वीट होतंय व्हायरल

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवणारे खेळाडू –

४९ विजय – रोहित शर्मा<br>४८ विजय – बाबर आझम<br>४५ विजय – ब्रायन मसाबा
४४ विजय – इऑन मॉर्गन
४२ विजय – असगर अफगाण
४२ विजय – एमएस धोनी

हेही वाचा – IND vs ENG Semifinal : राहुल द्रविडने निराश विराटला दिला धीर, सांत्वन करतानाचा VIDEO व्हायरल

भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये तिसऱ्यांदा दाखल –

पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत गतविजेत्या इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अशा प्रकारे भारतीय संघाने १० वर्षानंतर अंतिम फेरीत धडक मारली. कर्णधार रोहित शर्माच्या ३९ चेंडूत ५७ धावा आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या जोरावर भारताने २० षटकात ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १६.४ षटकांत १०३ धावांत गडगडला. भारताकडून मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने १९ धावांत तीन बळी घेतले, तर अक्षर पटेलने २३ धावांत तीन बळी घेतले. या कामगिरीसाठी अक्षरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आता शनिवारी संघाचा सामना जेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. २००७ मध्ये भारताने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते आणि आता विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे.