Rohit Sharma won most T20 matches for India as captain : भारताने बुधवारी (५ जून) आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत आपल्या टी-२० विश्वचषक मोहिमेची विजयाने सुरुवा केली आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. त्याने आयरिश संघाला १६ षटकांत ९६ धावांवर रोखले. यानंतर रोहित शर्मा आणि ऋषभ पंतने धावांचा पाठलाग करताना भारताला १३ व्या षटकात विजय मिळवून दिला. या सामन्यात रोहित शर्माने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकत इतिहास रचला आहे.

रोहितने धोनीचा विक्रम मोडत रचला इतिहास –

रोहित शर्माने आतापर्यंत ५५ टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. या काळात टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्वाखाली ४३ सामने जिंकले आहेत. तर एमएस धोनीने ७२ टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले. या काळात त्याने ४२ सामने जिंकले होते. अशा परिस्थितीत या यादीत एमएस धोनीला मागे टाकत रोहित शर्माने इतिहास रचला आहे. तो भारतासाठी सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा कर्णधार ठरला आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा चौथा कर्णधार ठरला आहे. या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम अव्वलस्थानी आहे.

टी-२० मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे कर्णधार :

७८ सामन्यात ४५ विजय – बाबर आझम (पाकिस्तान)
५६ सामन्यांत ४४ विजय – ब्रायन मसाबा (युगांडा)
७१ सामन्यांमध्ये ४४ विजय – इऑन मॉर्गन (इंग्लंड)
५५ सामन्यांत ४३ विजय – रोहित शर्मा (भारत)
५२ सामन्यांत ४२ विजय – असगर अफगाण (अफगाणिस्तान)
७२ सामन्यांमध्ये ४२ विजय – एमएस धोनी (भारत)
७६ सामन्यांमध्ये ४१ विजय – ॲरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया)

हेही वाचा – IND vs IRE : टी-२० विश्वचषकात टीम इंडियाची विजयी सलामी! आयर्लंडविरुद्ध रोहित-ऋषभसह जसप्रीत बुमराह चमकला

रोहित-ऋषभ पहिल्याच सामन्यात चमकले –

आयर्लंडने दिलेल्या ९७ धावांचा पाठलाग करताना ऋषभ पंतने १३व्या षटकात बॅरी मॅकार्थीच्या चेंडूवर षटकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५२ धावा केल्या. मात्र, त्याला दुखापत झाली. त्याच्या दुखापतीचे गांभीर्य अद्याप समजू शकलेले नाही. आता भारतीय संघ अ गटात दोन गुणांसह अव्वल स्थानावर आला आहे. त्याचा पुढचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी ९ जून रोजी होणार आहे. रोहित शर्मा व्यतिरिक्त ऋषभ पंतने नाबाद ३६ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर विराट कोहली (१) आणि सूर्यकुमार यादव (२) स्वस्तात बाद झाले.

हेही वाचा – IND vs IRE : टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, नोंदवला ‘हा’ खास विक्रम

भारतीय वेगवान गोलंदाजांनी तिसऱ्यांदा अशी कामगिरी केली –

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी विक्रमांची मालिका प्रस्थापित केली आहे. या सामन्यात अक्षर पटेल वगळता उर्वरित ८ विकेट्स वेगवान गोलंदाजांच्या खात्यात गेल्या. त्याचबरोबर एक आयरिश खेळाडू धावबाद झाला. यापूर्वी २००७ मध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजांनी जोहान्सबर्गमध्ये पाकिस्तानविरुद्ध ९ विकेट्स घेतल्या होत्या. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी २०२२ मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानविरुद्ध ८ विकेट्स घेतल्या होत्या.