Suryakumar Yadav Interview: भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले. राहुल द्रविड यांचा भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून ही अखेरची टूर्नामेंट होती आणि अखेरच्या सामन्यात आयसीसीचे जेतेपद पटकावणं यापेक्षा मोठी गोष्ट असूच शकत नाही. भारत वर्ल्ड चॅम्पियन ठरल्यानंतर राहुल द्रविड यांनी रोहित शर्माचे नोव्हेंबरमध्ये केलेल्या फोन कॉलसाठी आभार मानले, याचा खुलासा सूर्यकुमार यादवने केला आहे.

इंडियन एक्सप्रेसने वर्ल्डकप फायनलच्या दुसऱ्या दिवशी घेतलेल्या सूर्यकुमार यादवच्या मुलाखतीमध्ये अनेक विविध गोष्टींचा खुलासा केला. वर्ल्डकप पूर्वीच्या तयारीपासून ते फायनल सामन्यापर्यंत आणि विजयानंतरच्या सेलिब्रेशनपर्यंत बऱ्याच गोष्टी सांगितल्या. यादरम्यान सूर्याने राहुल द्रविड यांच्या योगदानाबद्दलही सांगितले.

हेही वाचा – T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण

राहुल द्रविड यांच्या संघामधील योगदानाबद्दल सांगताना सूर्या म्हणाला, वॉल कभी छुपता नहीं है और इंद्रनगर की दीवार को कोई कभी छुपा नहीं सक्ता है, असं म्हणत त्याने द्रविड यांचं कौतुक केलं. पुढे म्हणाला, लोकांच्या अपेक्षा, दबाव आणि खेळाडूंना दिलासा देणारी ‘भिंत’ त्यांनी निर्माण केली आहे. विराटसुद्धा त्यादिवशी हेच म्हणाला होता. जर एखाद्या फलंदाजाला एखादी गोष्ट योग्य वाटत असेल तर ते म्हणतात. ‘ठीक आहे, जर तुला ते योग्य वाटत असेल तर तसं ठरवं’. त्यांनी आपला अनुभव कधीच कोणावर लादला नाही. ते इतरांना समजून घेतात आणि बाकीचेही काय विचार करत आहेत याचाही विचार त्यांच्या मनात सुरू असतो. या साध्या गोष्टी आहेत ज्या आपण स्पर्धा जिंकल्यानंतर विसरतो. त्यांचे योगदान मोठे होते, त्याची विनोदबुद्धीही कमाल आहे.

“टी-२० विश्वचषकापूर्वी त्यांनी संपूर्ण भारतीय संघाने खेळलेल्या टी-२० सामन्यांच्या संख्येचा आलेख दाखवला, विराटपासून ते यशस्वी जैस्वालपर्यंत. ती संख्या ८०० पेक्षा जास्त होती,” असं सूर्या म्हणाला आणि मग द्रविड यांनी दुसरी स्लाईड दाखवली ज्यात राहुल द्रविडसह संपूर्ण कोचिंग स्टाफने खेळलेल्या सामन्यांची संख्या होती आणि ती संख्या १ होती. यानंतर द्रविड आम्हाला म्हणाले, ‘हे सर्व पाहता योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी सर्वोत्तम न्यायकर्ते आता तुम्हीच आहात. त्यामुळे इतर सर्व गोष्टी आमच्यावर सोडा आणि तुमच्या खेळाचा आनंद घ्या.”

हेही वाचा – VIDEO: दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूचं सूर्याच्या कॅचवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “बाऊंड्री कुशन हललं, पण…”

यामुळे एक सकारात्मकता पसरली. यावेळी, ‘द्रविड यांनी काही पर्यायी सराव सत्र ठेवली होती, परंतु प्रत्येकाला स्वत:हून वैकल्पिक सराव सत्रासाठी हजर राहायचं होतं. प्रत्येकाला एकमेकांसोबत वेळ घालवायचा होता. एकदा त्यांनी ग्रुपवर मेसेज केला होता की ते बीचवर जात आहे आणि सर्व पंधराच्या पंधरा खेळाडू तिथे पोहोचले. यावेळी वेगळाच माहोल होता.’

द्रविड यांच्या ट्रॉफी हातात घेतल्यानंतरच्या सेलिब्रेशनचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. अगदी खेळाडूंपेक्षा अधिक त्यांनी ती ट्रॉफी हातात आल्यावर जल्लोष केला होता. याबाबत सांगताना सूर्या म्हणाला, “तो ३० सेकंदाचा व्हीडिओ, जेव्हा द्रविड यांनी ट्रॉफी हातात घेऊन जो जल्लोष करत आपला आनंद व्यक्त केला तो क्षण काही वेगळाच होता. तो व्हीडिओ मी आयुष्यभरासाठी जतन करून ठेवेन.” यानंतर द्रविड यांनी रोहितचे आभार मानले आणि म्हणाले, “धन्यवाद, रोहित, नोव्हेंबरमध्ये त्या फोन कॉलसाठी”, कारण ५० षटकांच्या विश्वचषकातील भारताच्या पराभवानंतर द्रविड यांना भारताचे प्रशिक्षक म्हणून पुन्हा रूजू व्हायचे नव्हते पण रोहित आणि जय सरांनी (बीसीसीआय सेक्रेटरी जय शाह) त्यांना मनवले होते. असं सूर्यकुमार यादवने मुलाखतीत सांगितलं.