Suryakumar yadav Statement on Stunning Catch: टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावत भारतीय संघ वेस्ट इंडिजमधून ट्रॉफीसह भारतात परतणार आहे, तब्बल १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताने टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे, रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील परफेक्ट संघाने ही मोहिम फत्ते करून दाखवली आहे. भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेवर हा विजय मिळवला आहे. या विजयाचे अनेक नायक आहेत. पण सूर्यकुमार यादवने टिपलेल्या झेलची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. ३६० डिग्री फलंदाजी करणाऱ्या सूर्याने सीमारेषेवर असा काही झेल टिपला की सर्वांना आश्चर्याचा आणि सुखद धक्काही बसला कारण मिलरची विकेट संघासाठी खूपच महत्त्वाची होती.

सूर्यकुमार यादव टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये डेव्हिड मिलरच्या मॅच-विनिंग कॅचबद्दल उघडपणे बोलतो. इंडिया टुडेला दिलेल्या खास मुलाखतीत त्याने हा खुलासा केला. मिलरने हार्दिक पंड्याच्या पहिल्या फुल टॉस चेंडूवर मोठा फटका मारला, हा चेंडू हवेत उंच उडाला आणि सीमारेषेच्या दिशेने गेला. तिथे सूर्यकुमार सीमारेषेच्या जवळ होता. क्षणभर असे वाटत होते की चेंडू सीमारेषा ओलांडून जाईल, पण सूर्यकुमारने कमालीची कामगिरी करत अप्रतिम झेल घेत संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा – IND vs SA: सूर्या दादाच्या एका कॅचने फिरवली मॅच! सूर्यकुमारला बेस्ट फिल्डरचं मेडल देताना ड्रेसिंग रूममध्ये…; पाहा VIDEO

सूर्यकुमार झेलबद्दल म्हणाला, “आता हे सांगणं सोपं आहे, पण त्यावेळी असं वाटलं की चेंडू नाही ट्रॉफी सीमारेषा ओलांडून पलीकडे जात आहे. त्यावेळेला मला जे शक्य होतं ते सर्व केलं आणि त्या वेळी वारा देखील एक चांगला घटक होता. त्यामुळे मला थोडी मदत मिळाली. तसेच, आम्ही आमच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासोबत भरपूर सराव केला आहे आणि असे अनेक झेल यशस्वीपणे टिपले आहेत. त्यामुळे जेव्हा सामन्यात एवढा मोठा क्षण होतो, तेव्हा प्रसंगावधानत आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते.”

सूर्यकुमारने असेही सांगितले की एक क्षण असा आला की जेव्हा त्यांना वाटले की सामना आता त्यांच्यापासून दूर जात आहे. मात्र, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग सामना पुन्हा भारताच्या बाजूने फिरवू शकतात, असा त्याला विश्वास होता.

हेही वाचा – IND vs SA: “मी आदल्या रात्री…”, रोहित शर्माचे जेतेपदानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, “मला कोणत्याही परिस्थितीत ट्रॉफी जिंकायचीच होती”

“मला वाटतं की हा खूपच मजेदार खेळ आहे. शेवटच्या षटकातील चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोवर उत्कंठा वाढवत राहणारा हा खेळ आहे. असचं होतं, मी खरं सांगतोय. काही क्षणी आम्हाला वाटले की आमच्या विजयात फार अंतर निर्माण झाले आहे. पण गेल्या दोन महिन्यात दोन वर्षांत खासकरून टी-२० वर्ल्डकप २०२२ नंतर केलेल्या मेहनतीचा विचार मनात सतत सुरू होता. सामन्यातील शेवटच्या ५ ते ६ षटकांमध्ये माझ्या मनात हेच चालू होतं. तेव्हा बुमराहची २ आणि अर्शदीपची १ षटकं होतं आणि त्यांने सातत्याने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे मला विश्वास होता की हे लोक सामन्याला कलाटणी देऊ शकतात,” असं सूर्यकुमार म्हणाला.