भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध आज आपल्या टी-२० विश्वचषक २०२२ च्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. या दोन्ही संघातील सामन्याला दुपारी दीड वाजता मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरुवात होईल. या सामन्यासाठी जगभरातील चाहते उत्सुक आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली देखील या सामन्यासाठी उत्सुक आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर १ लाख चाहत्यांसमोर खेळला जाणार आहे. तत्पुर्वी टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहली म्हणाला की, या विशाल गर्दी समोर खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना विराट कोहली म्हणाला, “मी त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. जेव्हा मी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापेक्षा एक लाख चाहत्यांसमोर खेळेन. मी ईडन गार्डन्स येथे शेवटच्या वेळी असा क्षण अनुभवला होता, जिथे मला वाटते की सुमारे ९०,००० चाहते होते. संपूर्ण स्टेडियम गर्दीने खचाखच भरले होते.”

त्या वातावरणात भरकटून जाऊ शकता – विराट कोहली

विराट पुढे म्हणाला, ”मी मैदानात प्रवेश केला तेव्हा सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, कपिल देव, वसीम अक्रम आणि वकार युनूस हे क्रीडा क्षेत्रातील दिग्गज होते. ईडन गार्डनमधील वातावरण जबरदस्त आणि उत्साहवर्धक होते. परंतु मला एकाग्रतेची गरज होती, कारण तुम्ही त्या वातावरणात भरकटून जाऊ शकता.”

हे क्षण जगण्यासाठी खेळतो – विराट कोहली

माजी कर्णधार पुढे म्हणाला, “नक्की असेच वातावरण विश्वचषकात मोहालीत होते. खरे सांगायचे तर विश्वचषकाच्या सामन्यांदरम्यान वेगळेच वातावरण असते. ही एक वेगळी अनुभूती आहे, तुम्हाला ती उभारणी जाणवू शकते, तुम्ही विश्वचषक सामन्यांमध्ये खेळत असताना तुम्हाला माहिती आहे, सगळीकडे घबराट, अपेक्षा आणि गोंगाट असतो. मला क्षण ते आवडतात आणि मी त्या क्षणावर प्रेम करतो. हे असे क्षण आहेत जे संपूर्ण अनुभवाचा भाग आहेत. खरे सांगायचे तर, तुम्ही हे क्षण जगण्यासाठी खेळता.”

हेही वाचा – IND vs PAK T20 World Cup 2022 : हाय-व्होल्टेज सामन्यासाठी आकाश चोप्राने निवडली प्लेइंग इलेव्हन, ‘या’ दिग्गज खेळाडूला वगळले

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी.

पाकिस्तानचा संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि शान मसूद.