IND vs AUS Axar Patel’s Catch Video: एक कॅच मॅच जिंकवून देऊ शकते अशा काहीश्या आशयाची म्हण इंग्रजीत आहे. सोमवारी या म्हणीचं प्रत्यक्ष उदाहरण सुद्धा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात पाहायला मिळालं. ना पाऊस, ना वातावरणातील बदल, कुठल्याही बाह्य मदतीशिवाय भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून २०२३ च्या मायदेशातील पराभवाचा बदला घेतला. ग्रोस आयलेट, सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर आठच्या लढतीत भारताने काही महत्त्वाच्या विकेट्स घेताना दाखवलेल्या चपळाईमुळे सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

२०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, उपांत्य फेरीचे स्थान धोक्यात असताना, डेव्हिड वॉर्नर पहिल्या षटकात केवळ सहा धावांवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. पण कर्णधार मिचेल मार्शने ट्रॅव्हिस हेडसह अवघ्या ४८ चेंडूत ८१ धावांची भागीदारी केल्याने ऑस्ट्रेलियन संघ आश्चर्यकारक पद्धतीने खेळात वरचढ होताना दिसत होता. इतक्यातच अक्षर पटेलने ती जादुई विकेट घेतली आणि भारताचं पारडं पुन्हा जड झालं.

क्रीझवर अडून राहिलेल्या मार्शला बाद करणारी ती विकेट अक्षर पटेलने अक्षरशः एका हाताने पकडून खेळाची संपूर्ण दिशाच बदलली. नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादव गोलंदाजी करत असताना मिशेलचा स्ट्राईक ऑस्ट्रेलियासाठी आणखी एक चौकार वाटत होता. पण अचानक डीप मिड-विकेटवर उभ्या असलेल्या अक्षरने, अचूक वेळेवर उडी मारून एका हाताने बॉलला रोखून विकेट काढली. विशेष म्हणजे त्याने आपल्या कमी ताकदीच्या उजव्या हाताने ही विकेट घेतली. भारतीय समालोचक व माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्यावेळेस ऑन एअर म्हटल्याप्रमाणे त्याने अशी उडी मारली होती की बॉल त्याच्या हातात येऊन स्वतःच अडकला असं वाटलं. भारताने याआधी दोनदा मार्शला बाद केले होते, पण यावेळची विकेट भारताच्या संघासाठी सेमी फायनलचं तिकीट ठरली हे खरं.

अक्षरने घेतलेला झेल एवढा महत्त्वाचा का?

सामन्यानंतर क्रिकबझशी बोलताना, भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने अक्षरने घेतलेल्या त्या विकेटचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, समजा अक्षरने वेळीच ती विकेट घेतली नसती तर तो चेंडू षटकार गेला आणि असता आणि निश्चितच ऑस्ट्रेलियाने सामनाही पटकावला असता.

सेहवाग म्हणाला की, “अर्थात ही करो किंवा मरो अशी परिस्थिती होती. जर त्याने वेळीच लक्ष देऊन उडी मारली नसती तर तो फार चेंडूला स्पर्श करून, स्वतःच्या हाताला दुखापत करून घेऊन, सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला असता आणि मग भारताने सामना गमावला असता. पण वेळ साधल्याने सगळं काही उत्तम झालं त्यामुळे तो एक उत्कृष्ट झेल होता. अक्षरने उडी अचूकपणे घेतली आणि त्यानंतर त्याने सीमारेषेला स्पर्श होणार नाही याचीही काळजी घेतली.”

IND vs AUS Highlights: अक्षर पटेलने घेतलेली कॅच पाहा

हे ही वाचा << IND vs AUS: भारताने विश्वविक्रमासह सेमीफायनलमध्ये ऐटीत मारली धडक, ऑस्ट्रेलियाविरूद्ध रोहित-कुलदीप ठरले मॅचविनर

भारताचा पुढील सामना कधी?

दरम्यान, मार्श व हेड ही या सामन्यात ऑस्ट्रेलियाची एकमेव मोठी भागीदारी राहिली. पाठलागाच्या वेळी अर्शदीप सिंगने तीन गडी बाद केले आणि कुलदीपने आणखी एक विकेट घेतल्याने २०२१ च्या चॅम्पियनला ७ बाद १८१ धावांवर रोखता आले. या विजयासह, भारताने गट १ चा टॉपर संघ म्हणून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. २७ जून रोजी गयाना येथे भारताचा इंग्लंडशी सामना होईल, तर ऑस्ट्रेलियाचे भवितव्य अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील अंतिम सुपर आठ सामन्यावर अवलंबून आहे.