Team India Back, 16 Hours Long Journey Experience: प्रतिक्षेचं, मेहनतीचं गोड फळ भारतीय क्रिकेटसंघाला व कोट्यवधी चाहत्यांना २९ जूनच्या रात्री मिळालं. भारताने तब्बल १७ वर्षांनी विश्वचषकावर आपले नाव कोरलं. भारताचा हा विजय साजरा करण्यासाठी भारतात परत येण्यासाठी सुद्धा टीमला पाच दिवस वाट पाहावी लागली. बेरील चक्रीवादळामुळे अचानक रद्द झालेल्या फ्लाईट, खराब हवामान, यामुळे भारतीय संघ ब्रिजटाऊन आणि बार्बाडोसमध्ये अडकला होता. दोन दिवसांनी जेव्हा विमानतळावर कामकाज पुन्हा सुरु झालं तेव्हा अखेरीस बीसीसीआयने विशेष चार्टड प्लेन पाठवून टीम इंडियासह त्यांचे कुटुंब, सपोर्ट स्टाफ, कोच तसेच २० पत्रकारांना भारतात परत आणलं आहे. १६ तासांच्या विमानप्रवासानंतर आज सकाळी टीम इंडिया इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर मुंबईत मरीन ड्राइव्हवरून वानखेडे स्टेडियमपर्यंत खास सेलिब्रेशन परेडमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होतील. दरम्यान, या १६ तासांच्या प्रवासातील काही खास क्षण पत्रकारांनी शेअर केले आहेत. टीम इंडियाने १६ तासांच्या प्रवासात काय केलं हे पाहूया..

एअर इंडिया स्पेशल चार्टर फ्लाइट AIC24WC — Air India Champions 24 World Cup बुधवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे ४ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास बार्बाडोसहून निघाले, १६ तासांच्या नॉन-स्टॉप प्रवासानंतर गुरुवारी सकाळी ६ वाजता (IST) हे विमान दिल्लीत पोहोचलं. प्रवासाचा वेळ खूप जास्त असला तरी त्याहून जास्त ऊर्जा भारतीय खेळाडूंमध्ये होती बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुद्धा स्पष्ट पाहायला मिळतेय. रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद सिराज, चहल यांनी या व्हिडिओमध्ये आपल्या भावना शेअर केल्या होत्या.

भारतीय संघासाठी विमानात झाल्या घोषणा

एअर इंडियाच्या विशेष फ्लाइटमधून विविध वृत्तसंस्थांच्या तब्बल २० पत्रकारांना सुद्धा भारतात आणलं गेलं. पण बीसीसीआयने पत्रकारांना फोटो व व्हिडीओ न काढण्याची विनंती केली होती. इथे आपण एक कुटुंब म्हणून प्रवास करत आहोत त्यामुळे प्रत्येकाच्या प्रायव्हसीचे भान ठेवावे असे सांगण्यात आले होते. मात्र या प्रवासाचा अनुभव सांगताना विविध पत्रकारांनी काही खास क्षण सांगितले आहेत. जसे की, एअर इंडियाच्या पायलटने भारतीय संघाचे आभार मानण्यासाठी विशेष घोषणा केल्या होत्या. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपत असल्याने आतापर्यंतच्या योगदानासाठी आभार मानणारी एक घोषणा सुद्धा प्रवासादरम्यान करण्यात आली.

मीडियाच्या प्रतिनिधींना बीसीसीआयची खास सवलत

इंडिया टुडेने सांगितले की, भारतीय खेळाडू, त्यांचे कुटुंबीय आणि सपोर्ट स्टाफसाठी बिझनेस क्लासमध्ये सोय करण्यात आली होती. परंतु कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह अनेकजण पत्रकारांशी गप्पा मारण्यासाठी इकॉनॉमी क्लासमध्ये सुद्धा आले होते. या प्रवासात जसप्रीत बुमराह आपल्या मुलाची म्हणजेच अंगदची खूप काळजी घेत होता जेणेकरून इतक्या मोठ्या प्रवासाचा त्याला त्रास होऊ नये. या प्रवासात मीडियाच्या प्रतिनिधींना बीसीसीआयने विशेष सवलत देत टी २० विश्वचषकाच्या ट्रॉफीसह खास फोटो काढण्याची सुद्धा मुभा दिली होती.

हे ही वाचा<< विराट कोहली, रोहित शर्मा आता टी २० मधून निवृत्ती घेतल्यावर पुढे काय करणार? कशी असेल हुकमी एक्क्यांची पुढची खेळी?

दरम्यान, दिल्लीत एअरपोर्टवर उतरल्यावर टीम इंडियाच्या चाहत्यांनी हातात भारतीय राष्ट्रध्वज घेऊन संघाचं स्वागत केलं. नवी दिल्लीत उतरल्यानंतर खेळाडू आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये थांबले आहेत इथून ते पंतप्रधान मोदींना त्यांच्या कार्यालयात भेटणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला जातील. मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत संध्याकाळी ५ वाजता खुल्या बसमधून रोड शो होणार आहे.