Virat Kohli Retires from T20Is: विराट कोहलीच्या ७६ धावांच्या जोरावर भारताने टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात १७६ धावा इतकी मोठी धावसंख्या उभारली. यानंतर भारताने अवघ्या ७ धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद पटकावले आहे. संपूर्ण टी-२० विश्वचषकात शांत असलेली विराट कोहलीची बॅट तळपली आणि त्याच्या बॅटमधून बारतासाठी मॅचविनिंग खेळी पाहायला मिळाली. विराट कोहलीने ५९ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांसह ७६ धावांची खेळी केली. विराटच्या या खेळीसह विराटने रोहितचं म्हणणं खरं करून दाखवलं आहे. या विजयासह भारताचा विस्फोटक फलंदाज विराट कोहलीने मोठे वक्तव्य करत टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली आहे.

हेही वाचा – IND vs SA Final: किंग कोहलीने रोहितचं म्हणणं खरं करून दाखवलं! विराटने संयमी अर्धशतकासह तोडला बाबर आझमचा रेकॉर्ड

विराट कोहलीच्या या शानदार ७६ धावांच्या खेळीसाठी त्याला अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. यानंतर बोलताना विराट कोहलीने सर्वांनाच मोठा धक्का दिला आणि सांगितले, “हा माझा शेवटचा वर्ल्डकप आहे. हा माझा शेवटचा टी२० सामना आहे. विश्वविजेतेपदासह टी२० कारकीर्दीला अलविदा करण्याचा मी निर्णय घेतला आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला वाटू शकतं की एकही धाव होणार नाही, पण काही दिवस तुमचे असतात. देवाचे आभार मानतो. मी संघाच्या विजयाच्या योगदान देऊ शकलो याचं प्रचंड समाधान आहे. अंतिम सामन्याच्या संधीचं सोनं करायचं होतं. मला भारतासाठी वर्ल्डकप जिंकायचा होता. परिस्थितीचा आदर करत मी खेळायचं ठरवलं. मी भारतासाठी शेवटचा टी२० सामना खेळलो. नव्या पिढीकडे मशाल सोपवण्याची वेळ आली आहे. युवा खेळाडू या जबाबदारीसाठी सज्ज आहेत.”

हेही वाचा – T20 World Cup 2024: भारत ठरला विश्वविजेता, सूर्यकुमार यादवचा झेल आणि जसप्रीत बुमराहचे षटक ठरला टर्निंग पॉईंट

भारताने दिलेल्या १७७ धावांच्या मोबदल्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ आठ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १६९ धावा करू शकला. पुढील टी-२० विश्वचषक न खेळणाऱ्या विराटला विजयाची खात्री होती. यासोबतच प्रशिक्षक राहुल द्रविडचाही भव्य निरोप समारंभ झाला असल्याचे म्हटले आहे. भारतीय वेगवान गोलंदाजांनी झटपट दोन विकेट घेतल्या, त्यानंतर क्विंटन डी कॉक (३१ चेंडूत ३९ धावा) आणि ट्रिस्टन स्टब्स (२७ चेंडूत ५२ धावा) यांनी ५८ धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला सामन्यात परत आणले. रोहितने १५व्या षटकात अक्षरकडे चेंडू सोपवला ज्यात क्लासेनने दोन षटकार आणि दोन चौकार मारले. भारतासाठी सामना संपल्यासारखे वाटत होते पण शेवटच्या सहा चेंडूत १६ धावा हव्या असताना सूर्यकुमार यादवने लाँग ऑफ बाऊंड्रीवर अप्रतिम रिले झेल घेत विजय निश्चित केला.