Virat Kohli Creates History in ICC Men’s World Cups: टी-२० विश्वचषक २०२४ मधील सुपर८फेरीत भारत विरूद्ध बांगलादेश सामना खेळवला जात आहे. या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत १९६ धावा केल्या. यादरम्यान विराट कोहलीच्या बॅटमधून शानदार खेळी पाहायला मिळाली. विराटने संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि विश्वचषकाच्या (वनडे आणि टी-२०) इतिहासात एक अशी कामगिरी आपल्या नावे केली आहे, जे आजवर कोणताच खेळाडू करू शकलेला नाही.
भारत वि बांगलादेश सामन्यात टीम इंडियाला १९६ धावांपर्यंत नेण्यात हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंतचे सर्वात महत्त्वाचे योगदान होते. हार्दिक पांड्याने २७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार ५० धावांची नाबाद खेळी केली.तर ऋषभ पंतने २४ चेंडूत ४ चौकार आणि दोन षटकारांसह ३६ धावांचे योगदान दिले. त्याचवेळी शिवम दुबेनेही २४ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मानेही ११ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह झटपट २३ धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली.
बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहलीने २८ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. यादरम्यान विराटने १ चौकार आणि ३ षटकार लगावले आहेत. या डावात विराटने आयसीसी विश्वचषक (वनडे + टी-२०) मध्ये मिळून ३ हजार धावाही पूर्ण केल्या. विराट कोहली आयसीसी विश्वचषक स्पर्धेत ३००० धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी एकाही फलंदाजाला हा टप्पा गाठता आला नव्हता. टी-२० विश्वचषकात धावा काढण्यासाठी झगडत असलेल्या विराट कोहलीने एकाच मोठ्या खेळीत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (वनडे + टी-२०)
३००२ धावा – विराट कोहली*
२६३७ धावा – रोहित शर्मा<br>२५०२ धावा – डेव्हिड वॉर्नर<br>२२७८ धावा – सचिन तेंडुलकर
२१९३ धावा – कुमार संगकारा
२१७४ धावा – शकिब अल हसन
२१५१ धावा – ख्रिस गेल
© IE Online Media Services (P) Ltd