T20 World Cup Final 2024, India vs South Africa Score: भारतीय संघाने अंतिम फेरीत विराट कोहलीच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर १७६ धावा केल्या आहेत. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय संघाने अवघ्या ३४ धावांत ३ विकेट गमावल्या. यानंतर संपूर्ण विश्वचषकाच्या मोसमात अपयशी ठरलेल्या विराट कोहलीने भारतीय डावाची धुरा सांभाळत परिस्थिती पाहत संयमी फंलदाजी करत अर्धशतकही झळकावले. विराट कोहलीने ५९ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांसह ७६ धावांची खेळी केली. विराटच्या या खेळीसह विराटने रोहितचं म्हणणं खरं करून दाखवलं आहे.

भारताने फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली पण नंतर त्यांनी झटपट दोन विकेट्स गमावल्या. पण विराट कोहलीने डाव सावरला खरा पण अक्षर पटेलनेही दुसऱ्या टोकावरून कोहलीला पूर्ण साथ दिली आणि त्यानेही ३१ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याच्या अर्धशतकादरम्यान बाबर आझमचा विक्रम मोडला आणि तो टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. बाबर आझमने टी-२० मध्ये एकूण ४१४५ धावा केल्या आहेत, मात्र आता कोहलीने त्याला मागे टाकले आहे. मात्र, या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – IND vs SA Final Live Score : जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्याच षटकात दिला पहिला धक्का, रीझा हेंड्रिक्सचा उडवला त्रिफळा

हेही वाचा – IND vs SA: ICC टूर्नामेंटमध्ये विराट कोहली रोहित शर्माने मिळून रचला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये नावे केली मोठी कामगिरी

टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप ३ फलंदाज

रोहित शर्मा- ४२३१ धावा
विराट कोहली- ४१८८ धावा
बाबर आझम- ४१४५ धावा

रोहित शर्मा विराटबद्दल काय म्हणाला होता?

इंग्लंडविरूद्धच्या सेमीफायनलमधील विजयानंतर विराट कोहलीबाबत रोहित शर्मा म्हणाला की, “कोहली एक उत्कृष्ट खेळाडू आहे. कोणताही खेळाडू खराब फॉर्ममधून जाऊ शकतो. त्याची खेळण्याची पध्दत आणि अशा मोठ्या सामन्यांमधील त्यांचे महत्त्व आम्हाला माहित आहे. १५ वर्ष खेळलेल्या खेळाडूसाठी फॉर्म हा चिंतेचा विषय नाही. त्याने सर्वोत्तम खेळी फायनलसाठी राखून ठेवली असावी.” यंदाच्या टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीपासून विराट कोहली रोहित शर्मासोबत भारतीय संघासाठी सलामीसाठी उतरत ​​आहे. दुर्दैवाने, त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला कारण फायनलपूर्वी तो ७ डावात केवळ ७५ धावा करू शकला होता, पण रोहितने मात्र तरीही त्याला पाठिंबा देत म्हटले की विराटने त्याची खेळी फायनलसाठी राखून ठेवली आहे आणि विराटनेही अगदी तसंच केलं. भारतीय संघाला गरज असताना तो मैदानात पाय घट्ट रोवून उभा राहिला आणि भारताला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.