We know how special Virat is so we just have to wait and see : टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे. हा सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल ब्रिजटाउन मैदानावर होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ आपल्या जेतेपदांचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करताना दिसेल. या सामन्यात भारतीय चाहत्यांची खराब फॉर्ममधून जात असलेल्या विराट कोहलीची बॅट तळपावी, अशी आशा आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर आणि कर्णधार ख्रिस गेलने खराब फॉर्ममध्ये झगडत असलेल्या फलंदाज विराट कोहलीचे समर्थन केले आहे. किंग कोहलीला कमी लेखता येणार नाही, असे या अनुभवी खेळाडूने सांगितले.

विराट कोहलीचा फॉर्म चिंताजनक –

सध्याच्या स्पर्धेत विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. विराट कोहली खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात सौरभ नेत्रावलकरने त्याला शून्यावर बाद केले होते. टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये कोहलीने आतापर्यंत सात सामन्यांमध्ये केवळ ७५ धावा केल्या आहेत.

ख्रिस गेलने केले विराट कोहलीचे कौतुक –

विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी ख्रिस गेलने विराट कोहलीच्या फॉर्मवर प्रतिक्रिया देत म्हणाला, “विराटसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत या गोष्टी घडतात. २०२३ च्या विश्वचषकात त्याची कामगिरी किती प्रभावी ठरली हे आपण पाहिली. वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतो. पण यातील चांगली गोष्ट म्हणजे तो संघात कायम आहे. त्यामुळे तो फायनल सामन्यात चांगली कामगिरी करुन संघाला विजय मिळवून देऊ शकतो. विराट कोहली किती खास खेळाडू आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे कोहलीला कमी लेखता येणार नाही. म्हणून आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल आणि तो फायनलमध्ये कशी कामगिरी करतो ते पहावे लागेल.”

हेही वाचा – IND vs SA Final : काशीत ‘विजय यज्ञ’ तर सिद्धिविनायक मंदिरात पूजा, भारताच्या विजयासाठी चाहत्यांनी देवाकडे घातलं साकडं, पाहा VIDEO

आयपीएलमध्ये कोहलीची बॅट गर्जत होती –

सध्याच्या स्पर्धेपूर्वी कोहली आयपीएल २०२४ मध्ये खेळताना दिसला होता. या काळात त्याने १५४.६९ च्या स्ट्राईक रेटने एक शतक आणि पाच अर्धशतकांसह ७४१ धावा केल्या. तो ऑरेंज कॅपच विजेता ठरला होता. मात्र २०२४ च्या टी-२० विश्वचषकातील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात तो अपयशी ठरला आहे. अंतिम सामन्यात त्याची बॅट पुन्हा एकदा तळपेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.