India vs West Indies T20 Series: वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५व्या टी२० सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा ८ विकेट्सनी पराभव झाला. यासह टीम इंडियाने मालिका ३-२ने गमावली. सलग १२ मालिकेनंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा टीम इंडियाला मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे, त्यामुळे भारतीय संघाची नाचक्की झाली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा मोठा विक्रम एका झटक्यात मोडला. इतकंच नाही तर या मालिकेमुळे टीम इंडियाला आणखी अनेक मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१७ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत पराभवामुळे टीम इंडियाचा १७ वर्ष जुना विक्रम मोडला गेला आहे. टीम इंडियाने गेल्या १७ वर्षांत वेस्ट इंडिजविरुद्ध किमान तीन सामन्यांची एकही मालिका गमावलेली नाही. मात्र येथे पराभूत झाल्यानंतर संघाच्या नावावर हा नकोसा विक्रम नोंदवला गेला असून यामुळे टीम इंडियाची मान शरमेने खाली गेली आहे.

२५ महिन्यांत पहिली मालिका गमावली

इतकेच नाही तर भारतीय क्रिकेट संघाने गेल्या २५ महिन्यांपासून एकही टी२० मालिका गमावलेली नाही. शेवटच्या वेळी टीम इंडियाने जुलै २०२१मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, पुढील २ वर्षे, भारतीय क्रिकेट संघाने जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एकही टी२० मालिका गमावली नाही.

हे पहिल्यांदाच घडले

या पराभवामुळे हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आणखी एक लाजिरवाणा विक्रम केला. टीम इंडियाने टी२० क्रिकेटमधील कोणत्याही मालिकेतील तीन सामने कधीही गमावलेले नाहीत. पण हे वेस्ट इंडिजमध्येही घडले. त्याचबरोबर या मालिकेतील पराभवामुळे कर्णधार हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रथमच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, टी२० रॅकिंगमध्येही पडझड होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: IND vs WI 5th T20: मालिका गमावल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याचे आश्चर्यचकित करणारे विधान; म्हणाला, “कधी कधी पराभव…”

टीम इंडियाच्या पराभवामुळे चाहते संतापले

वेस्ट इंडिजला तब्बल ७ वर्षांनंतर भारताविरुद्धची मालिका जिंकण्यात यश आले. टी२० मालिकेत भारताच्या पराभवानंतर चाहते कर्णधार हार्दिक पांड्यावर खूप निराश झाले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी हार्दिक पांड्याबद्दल जहाल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हार्दिककडून कर्णधारपद काढून घेण्याबाबत अनेकांनी मत व्यक्त केले. त्याचवेळी हार्दिक हा भारताचा भावी कर्णधार होऊ शकत नाही, असे काही लोक म्हणाले. टी२० मालिकेतील शेवटचा आणि शेवटचा सामना फ्लोरिडामध्ये खेळला गेला, ज्यामध्ये हार्दिक पांड्या फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात अपयशी ठरला. प्रथम फलंदाजी करताना हार्दिकने १८ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने केवळ १४ धावा केल्या. यानंतर त्याने ३ षटकात गोलंदाजी केली ज्यात त्याने ३२ धावा दिल्या आणि एकही विकेट मिळाली नाही.

हार्दिक सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. टी२० मालिकेच्या सुरुवातीपासूनच भारतीय कर्णधार चाहत्यांच्या लक्ष्यावर आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिले दोन सामने गमावले होते. यानंतर भारताने पुढील दोन सामने जिंकले, मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ निर्णायक सामना जिंकू शकला नाही. या पराभवानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In hardik pandyas captaincy made team indias embarrassing breaking a 17 year old record avw