Shreyas Iyer fails in Ranji Trophy semi-final : रणजी ट्रॉफीच्या चालू मोसमातील दुसरा उपांत्य सामना मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात खेळला जात आहे. बीसीसीआयच्या खेळाडूंच्या केंद्रीय करार यादीमधून वगळलेला श्रेयस अय्यरही या सामन्यात खेळत आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्याच्या कामगिरीवर खिळल्या होत्या, परंतु दुसऱ्या दिवसाच्या खेळात श्रेयस सपशेल अपयशी ठरला. तो मुंबईच्या पहिल्या डावात अवघ्या ३ धावा करून बाद झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रेयस अय्यर ठरला संदीप वारियरचा बळी –

मुंबईविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी तामिळनाडूचा संघ पहिल्या डावात अवघ्या १४६ धावांवर गारद झाला. यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबई संघाने २ गडी गमावून ४५ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात तामिळनाडू संघाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत ४ गडी बाद केले. मुंबईने ९१ धावांपर्यंत मजल मारली होती.

यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरकडून सगळ्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र ३ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर तामिळनाडू संघाचा वेगवान गोलंदाज संदीप वॉरियरने त्याच्या एका शानदार इनस्विंग चेंडूवर त्याला झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी श्रेयससाठी या सामन्यात कामगिरी करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते, त्यानंतर आता या सामन्यात मुंबई संघाच्या दुसऱ्या डावात तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – NZ vs AUS Test : नॅथन लायनने गोलंदाजीसह फलंदाजीतही रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिलाच खेळाडू

१२५ धावांपर्यंत मुंबईने ७ विकेट्स गमावल्या –

श्रेयस अय्यर ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतल्याने या सामन्यात मुंबई संघाने पहिल्या डावात ५१ षटकानंतर ७ बाद १२५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये मुशीर खानने निश्चितपणे संघासाठी ५५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. मुंबईच्या चार फलंदाजांना दुहेरी धावासंख्याही गाठता आली नाही. कर्णधार अजिंक्य रहाने पुन्हा एकदा मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला आहे. तामिळनाडूने या सामन्यात आतापर्यंत ५ विकेट्स घेणाऱ्या आर साई किशोरची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the second semi final of the ranji trophy 2024 shreyas iyer was dismissed for 3 runs vbm