IND vs AUS Harmanpreet Kaur reaction on India defeat : रविवारी ‘करा या मरो’च्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा नऊ धावांनी पराभव करून उपांत्य फेरीतील भारताचा मार्ग कठीण केला. शारजाह येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात, गतविजेत्याने फलंदाजीव्यतिरिक्त गोलंदाजीमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आणि चांगल्या नेट रन रेटच्या जोरावर अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. त्यामुळे आता भारतीय संघाला इतर संघाच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल. या सामन्यातील पराभवानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने निराशा व्यक्त केली. त्याबरोबर ऑस्ट्रेलियाचा उल्लेख करताना ती म्हणाले की, त्यांच्या विजयात संपूर्ण संघाचे योगदान होते.

त्यांच्या विजयात संपूर्ण संघाचे योगदान होते –

सामन्यानंतर भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, ‘मला वाटते की त्यांच्या विजयात संपूर्ण संघाचे योगदान होते, ते कोणत्याही एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून नव्हते. त्यांच्याकडे योगदान देणारे अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत. आम्ही चांगले नियोजन केले होते आणि आम्ही शेवटपर्यंत सामन्यात होतो. पण त्यांनी सहज धावा दिल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला पुढे जाणे कठीण झाले.राधाने खूप चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केले.

ऑस्ट्रेलियाकडून आपण खूप काही शिकू शकतो –

हरमनप्रीत कौर पुढे म्हणाली, ‘हे एक असे लक्ष्य होते, गाठता आले असते. दीप्ती आणि मी फलंदाजी करत होतो, तेव्हा आम्हाला काही मोठे फटके मारण्यासारखे चेंडू मिळाले होते, परंतु आम्ही त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. आजच्या सामन्यात आपण ऑस्ट्रेलियाकडून आपण खूप काही शिकू शकतो. पण आमच्या हातात जे होते ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही गोष्टी तुमच्या हातात नसतात.’

हेही वाचा – IND-W vs AUS-W Highlights : ऑस्ट्रेलियाने रोमांचक सामन्यात भारताचा उडवला धुव्वा, टीम इंडिया कशी पोहोचणार उपांत्य फेरीत? जाणून घ्या

काय घडलं सामन्यात?

महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या १८व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ विकेट्स गमावत १५१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ २० षटकांत ९ गडी गमावून १४२ धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाच्या नेट रनरेटला मागे टाकण्यासाठी भारताला १०.२ षटकांत किंवा त्यापेक्षा कमी वेळात लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. मात्र, आता पराभूत झाल्याने भारताचा उपांत्य फेरीतील मार्ग खडतर झाला आहे. आता भारताचे भवितव्य न्यूझीलंड-पाकिस्तानवर अवलंबून आहे, ज्यामध्ये भारताला पाकिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागेल.