India vs Australia 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी मोहालीत होणार आहे. विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांची ही शेवटची वनडे मालिका आहे. यानंतर दोन्ही संघ क्रिकेटच्या महाकुंभात म्हणजेच एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये प्रवेश करतील. ही एकदिवसीय मालिका जिंकून भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना आपली तयारी मजबूत करायची आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ खूप मजबूत दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, पहिल्या वन डेत मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल हे खेळणार नाहीत कारण, दोघेही अनफिट आहेत. पुढील दोन सामन्यात कदाचित ते खेळू शकतात. दुसरीकडे भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी आला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संघात विस्फोटक अष्टपैलू खेळाडूंची उपस्थिती आहे. मिचेल मार्श, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस आणि शॉन अ‍ॅबॉट हे घातक गोलंदाजी आणि गरज असेल तेव्हा तुफानी फलंदाजी देखील करू शकतात.

भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेत श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्तीवर आणि सूर्यकुमार यादव वनडेत आपली जागा कशी पक्की करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी ही एकदिवसीय मालिका दोन्ही संघांची रंगीत तालीम असेल. रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांना मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी बेंच स्ट्रेंथ तपासण्याची ही शेवटची संधी असेल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे मालिका श्रेयस आणि सूर्या या दोघांसाठी महत्त्वाची आहे

मुंबईचे दोन फलंदाज अय्यर आणि सूर्यकुमार विश्वचषकापूर्वी आपापल्या परीने लढत आहेत. २८ वर्षीय अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या सहा महिन्यांत केवळ दोन सामने खेळला आहे. आशिया चषक स्पर्धेत पुनरागमन करताना, तो फक्त दोन सामने खेळू शकला आणि सुपर-४ मधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाठीच्या दुखण्यामुळे त्याला बाहेर पडावे लागले. अय्यर पुन्हा अनफिट झाल्यामुळे, विश्वचषकात खेळण्यासाठी त्याच्या पूर्णपणे तंदुरुस्त असण्यावरच संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. दुसरीकडे, अनेक दिग्गजांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीवरही प्रश्न उपस्थित केले ज्याने त्याला फिटनेस चाचणी उत्तीर्ण घोषित केले.

हेही वाचा: IND vs AUS: एकदिवसीय मालिकेपूर्वी पॅट कमिन्सचे टीम इंडियाला आव्हान; म्हणाला, “विश्वचषकापूर्वी घरच्या मैदानावर…”

निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी म्हटले आहे की, “अय्यर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे पण अय्यर पुढील पाच दिवसांतील तीन सामन्यांमध्ये १०० पेक्षा जास्त षटके खेळण्यास तयार आहे का, हा प्रश्न आहे. इशान किशनने अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली असली तरी विश्वचषकात मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजी हाताळण्यासाठी भारताला श्रेयस अय्यरची गरज भासणार आहे म्हणूनच त्याला संघात ठेवले आहे.”

सूर्यकुमार यादवसाठी एक वेगळीच समस्या आहे, टी२० मधील जगातील नंबर वन फलंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. २७ एकदिवसीय सामने खेळल्यानंतरही सूर्याची सरासरी २५ पेक्षा कमी असल्याने त्याची प्रतिभा आणि क्षमता दोन्ही सिद्ध होत नाही. सूर्याला विश्वचषकातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये स्थान मिळणे जरी कठीण असले तरी संघ व्यवस्थापनाने त्याला विश्वचषक संघात स्थान देऊन कोणतीही चूक केलेली नाही हे तो या मालिकेतून सिद्ध करू शकतो. ३३ वर्षीय तिलक वर्मा याच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची ही शेवटची संधी असेल, कारण तो कदाचित पुढचा विश्वचषक खेळू शकणार नाही.

हेही वाचा: Asian Games 2023, IND vs BAN: भारताचे एशियन गेम्समधील आव्हान कायम, छेत्रीच्या एका गोलमुळे बांगलादेशवर १-०ने दमदार विजय

२१ महिन्यांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या अश्विनकडे लक्ष

अक्षर पटेलला झालेल्या दुखापतीमुळे ३७ वर्षीय रविचंद्रन अश्विनला तिसऱ्यांदा विश्वचषक खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत, अश्विन टीम इंडियाच्या व्यवस्थापनाच्या रडारवरही नव्हता आणि आता हा स्टार ऑफस्पिनर विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी युवा वॉशिंग्टन सुंदरशी स्पर्धा करत आहे. तज्ज्ञांच्या मते, अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी जरी करू शकला नाही तरी संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत वॉशिंग्टन सुंदरच्या खूप पुढे आहे. एकदिवसीय मालिकेत अश्विनची वॉर्नर आणि स्मिथविरुद्धची लढत चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरू शकते.

पहिल्या दोन वनडेत कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांच्या अनुपस्थितीत अश्विन आणि वॉशिंग्टन या दोघांनाही आपली क्षमता दाखवण्याची सुवर्णसंधी असेल. पण अश्विनने एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली तरीही अक्षर पटेल तंदुरुस्त होऊन तिसऱ्या वन डेसाठी खेळल्यास संघ व्यवस्थापन त्याला प्राधान्य देईल, अशी शक्यता आहे. अक्षराची दुखापत दोन आठवड्यांत बरी होण्याची अपेक्षा आहे, कारण वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकीपटूंना बरे होण्यास कमी वेळ लागतो. अशा स्थितीत अक्षर पटेल विश्वचषकापूर्वी तंदुरुस्त होईल, अशी आशा भारतीय संघाला असेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus india will become number 1 by defeating australia eyes will be on ashwin surya avw
Show comments