India vs Australia 1st ODI: मोहाली येथे शुक्रवारी (२२ सप्टेंबर) झालेल्या पहिल्या वन डेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयात मोहम्मद शमीचे महत्त्वाचे योगदान होते. शमीने शानदार कामगिरी करत ५ विकेट्स घेतल्या आणि टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा डाव २७६ धावांत गुंडाळला. शमी त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये खूप प्रभावी होता आणि त्यानंतर डेथ ओव्हर्समध्येही त्याने लोअर ऑर्डरला झटपट बाद करण्यात मदत केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहालीचे हवामान आणि आर्द्रता यामुळे अनेक भारतीय क्रिकेटपटू त्रस्त दिसले आणि जेव्हा समालोचक हर्षा भोगले यांनी मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियन डावानंतर मोहालीच्या स्थितीबद्दल विचारले तेव्हा त्याच्या उत्तराने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आले. सामना संपल्यानंतरही शमीला तोच प्रश्न पुन्हा विचारण्यात आला आणि त्यावेळीही त्याने मजेशीर उत्तर दिले आणि एकच हशा पिकला. त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

तुम्ही एसीमध्ये होतात आणि मी उन्हात घाम गाळत होतो- मोहम्मद शमी

मोहम्मद शमी म्हणाला, “(आप एसी में थे, मैं गर्मी में था) तुम्ही लोक एसीमध्ये होतात, मी बाहेर उन्हात होतो. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना फारशी मदत मिळत नव्हती, त्यामुळे संथ चेंडू हा एकमेव पर्याय होता. जर तुम्ही योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. मी देखील तसेच केले आणि परिणाम खरोखरच तुमच्या बाजूने जाऊ शकतो, हे दिसून आले. गोलंदाजीत विविधता आणणे हे यावेळी अशा परिस्थितीत फार महत्वाचे आहे. तुम्ही खूप मेहनत घेत असताना विकेट्स मिळणे ही आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट आहे. हे संघासाठी आणि तुमच्या वैयक्तिक कामगिरीसाठी चांगली बाब आहे.”

हेही वाचा: IND vs AUS 1st ODI: टीम इंडिया बनली नंबर १! भारताची ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सने मात, शुबमन-ऋतुराज चमकले

हर्षा भोगलेंना शमी पुढे म्हणाला की, “तुम्ही एसीमध्ये कॉमेंट्री करतात त्यामुळे तुम्हाला ही गरमी जाणवणार नाही. सलग ४-५ स्पेलनंतर तुम्हाला तुमची ऊर्जा संपूर्ण सामन्यासाठी सांभाळून ठेवावी लागते. आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची दुखापत आम्हाला परवडणारी नाही. मोहम्मद सिराज आणि मी आम्ही सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहोत आणि ही टीम इंडियासाठी आनंदाची बाब आहे.”

शमीने मोहाली एकदिवसीय सामन्यात आपले गोलंदाजी कौशल्य सिद्ध केले, ५१ धावांत ५ विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला २७६ धावांवर रोखण्यात भारताला यश आले. शमीने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शला (४) डावाच्या पहिल्याच षटकात स्लिपमध्ये शुबमन गिलकडे झेलबाद केले. यानंतर, जेव्हा तो १९व्या षटकात त्याच्या दुसऱ्या स्पेलसाठी परतला तेव्हा त्याने स्टीव्ह स्मिथला (६० चेंडूत ४१ धावा) उत्कृष्ट चेंडू टाकला. डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा काढणाऱ्या मार्कस स्टॉयनिसला (२१ चेंडूत २९ धावा) शमीने बाद केले. एकूणच, त्याने १ मेडन टाकली आणि १० षटकात ५१ धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या.

हेही वाचा: ICC Rankings: एकच नंबर! क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा बोलबाला, जगात फक्त दोन संघांना जमला हा पराक्रम

भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 विकेटने पराभव केला

शमीच्या दमदार गोलंदाजीनंतर भारतीय फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. शुबमन गिल (७१) आणि ऋतुराज गायकवाड यांनी अवघ्या २१.४ षटकांत पहिल्या विकेटसाठी १४२ धावांची सलामी देत ​​सामना जवळपास एकतर्फी केला. मात्र, यानंतर अॅडम झाम्पाने प्रथम ऋतुराज आणि नंतर गिलला बाद करून ऑस्ट्रेलियाला दमदार पुनरागमन केले, श्रेयस अय्यर (३) स्वस्तात धावबाद झाला. पण कर्णधार के.एल. राहुलचे (५८*) नाबाद अर्धशतक आणि सूर्यकुमार यादवचे (५०) तिसरे वन डे अर्धशतक यांच्या जोरावर भारताने ८ चेंडू बाकी असताना २८१/५ धावा करून विजयाचे लक्ष्य गाठले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus you were in ac i was in heat why did shami say this after taking 5 wickets avw