IND vs BAN 1st Test old lady reaction on R Ashwin video viral : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन दमदार शतक झळकावून चर्चेत आला. अश्विनने भारताचा अडखळणार डाव सावरत कसोटी कारकीर्दीतील सहावे शतक झळकावले. अश्विनच्या या शानदार शतकाचे चाहत्यांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. मात्र, एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक वृद्ध महिला रविचंद्रन अश्विनच्या प्रत्येक चौकार-षटकारानंतर आनंद व्यक्त करताना दिसत आहे.

चेन्नईच्या घरच्या मैदानावर अश्विनने कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. ११२ चेंडूंचा सामना करत अश्विनने १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०२ धावांची नाबाद खेळी करत भारताला संकटातून बाहेर काढले. त्याचबरोबर जडेजाने नाबाद ८६ धावा करत त्याला चांगली साथ दिली. अश्विनने आपले शतक पूर्ण केल्यावर त्याच्या सहकारी खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये उभे राहून टाळ्या वाजवल्या. त्या प्रत्येक चौकार-षटकारावर टाळ्या वाजवून अश्विनचा हुरुप वाढवत होत्या.

आजीचा व्हिडीओ झाला व्हायरल –

दरम्यान, स्टँडमध्ये बसलेली एक वृद्ध महिला चर्चेत आली आहे. वृद्ध महिलेच्या दोन्ही हातात चहाचे कप होते, तरीही तिने अश्विनच्या खेळीचे कौतुक केले. यानंतर आजीने चहाचे कप बाजूला ठेवून अश्विनच्या खेळीसाठी उभा राहून टाळ्याही वाजवल्या आहे. आजीचा हा व्हिडीओ सर्वांची मनं जिंकत असून प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते अश्विनच्या खेळीबरोबर आजीच्या उत्साहाचे पण कौतुक करत आहेत.

हेही वाचा – IND vs BAN : रविचंद्रन अश्विनचे ऐतिहासिक शतक! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

अश्विन-जडेजा भारतासाठी संकटनिवारक ठरले –

रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिल लवकर बाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत आला होता. यानंतर ऋषभ पंत आणि केएल राहुल यांनाही मोठी खेळी करता आली नाही. जडेजा आणि अश्विनने सातव्या विकेटसाठी १९५ धावांची नाबाद विक्रमी भागीदारी करून संघाला अडचणीतून बाहेर तर काढलेच शिवाय मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ८० षटकानंतर ६ गडी गमावून ३३९ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – IND vs BAN : अश्विनच्या झुंजार शतकी खेळीच्या जोरावर भारताने उभारला धावांचा डोंगर, बांगलादेशी गोलंदाजांची उडवली झोप

यशस्वी जैस्वालचेही अर्धशतक –

यशस्वी जैस्वाल वगळता भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी सहा धावा करुन बाद झाले. त्याचबरोबर शुबमन गिलला खातेही उघडता आले नाही. यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत ३९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. केएल राहुल देखील पहिल्या डावात छाप पाडू शकला नाही आणि १६ धावा करून सहावा फलंदाज म्हणून बाद झाला. मात्र, अश्विन आणि जडेजाशिवाय सलामीवीर यशस्वी जैस्वालनेही आपली ताकद दाखवत ११८ चेंडूत नऊ चौकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या.