IND vs BAN 1st Test Dinesh Karthik revealed about R Ashwin father prediction : भारत आणि बांगलादेश संघांतील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला १९ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. चेन्नईत खेळलेल्या जात असलेल्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत आहे. या पहिल्या डावात एकामागून एक विकेट पडत राहिल्या आणि भारताची धावसंख्या १४४ धावांवर सहा विकेट्स अशी झाली. यानंतर अश्विनने जडेजाला साथीला घेत शतकी खेळी साकारत भारतीय संघाचा डाव सावरला. याबद्दल बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला की अश्विनच्या वडिलांना अगोदर भाकीत केले होते.

यशस्वी जैस्वाल ५६ धावा करून बाद झाला, तर ऋषभ पंत ३९ धावा करून बाद झाला, तर कर्णधार रोहित शर्मा (६), शुभमन गिल (०), विराट कोहली (६) आणि केएल राहुल (१६) स्वस्तात बाद झाले. त्यामुळे अचानक रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली. एकेकाळी असे वाटत होते की भारत २०० धावाही करू शकणार नाही, पण आर अश्विनच्या वडिलांना विश्वास होता की भारत चांगल्या स्थितीत पोहोचेल आणि आपला मुलगा काहीतरी आश्चर्यकारक करेल.

अश्विनच्या वडिलांच्या भाकिताबद्दल दिनेश कार्तिकडून खुलासा –

सामन्याच्या पहिल्या दिवशी, जेव्हा भारताची धावसंख्या ६ विकेट्सवर २१९ धावा होती, तेव्हा दिनेश कार्तिकने इंग्रजीत समालोचन दरम्यान अश्विनच्या वडिलांच्या भाकिताबद्दल सांगितले. दिनेश कार्तिक समालोचन करताना म्हणाला, “मी अश्विनच्या वडिलांशी बोलत होतो, त्यांची खोली आमच्या जवळ आहे, ते अगदी निवांत होते, तेव्हा ते म्हणाले दिनेश तुला वाटतं की भारत २०० हून अधिक धावा करू शकेल? यावर मी त्यांना सांगितलं, होय नक्कीच. ज्यावर ते म्हणाले की, हो माझा मुलगा आज काहीतरी आश्चर्यकारक करेल.”

हेही वाचा – IND vs BAN : अश्विनच्या दमदार खेळीचे आजीकडून कौतुक, स्टँडमध्ये उभा राहून टाळ्या वाजवतानाचा VIDEO व्हायरल

अश्विनचे वडील अजूनही सामने पाहतात – दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिक समालोचन करताना पुढे म्हणाला, “अश्विनचे वडील अजूनही सामने पाहतात. ते अनेक वर्षांपासून असे करत आहेत. आजही ते अश्विन खेळत नसताना अनेक प्रथम श्रेणीचे सामने बघायला जातात. त्यांना क्रिकेटबद्दल खूप आवड आहे.” दिनेश कार्तिकच्या समालोचनाची ही क्लिप सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. दिनेश कार्तिक हा भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेदरम्यान इंग्रजी समालोचन पॅनेलचा एक भाग आहे. चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने सहा विकेट्सवर ३३९ धावा केल्या होत्या, अश्विनने १०२ धावा केल्या, तर रवींद्र जडेजा ८६ धावा करून नाबाद परतला.