IND vs BAN Dinesh Karthik reaction on Rishabh Pant and MS Dhoni : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला सामना चेन्नई येथे पार पडला. या सामन्यात भारताने बांगलादेशचा २८० धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात ऋषभ पंतने सुमारे २० महिन्यांनंतर कसोटीत पुनरागमन करत शतक झळकावले. त्याचबरोबर ऋषभने कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाच्या बाबतीत त्याने महेंद्रसिंग धोनीची बरोबरी केली. यानंतर तो धोनीपेक्षा सरस असल्याचे चर्चा सुरु झाली, ज्यावर दिनेश कार्तिकने आता महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

‘ऋषभ पंतला इतक्यात सर्वकालीन महान म्हणणे अस्वीकार्य’ –

क्रिकबझशी बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला की, ऋषभ पंतला इतक्यात सर्वकालीन महान म्हणणे अस्वीकार्य आहे. कारण त्याने केवळ ३४ सामने खेळले आहेत. कार्तिक म्हणाला, ‘त्याला इतक्यात सर्वकालीन महान म्हणणे अस्वीकार्य आहे. कारण तो केवळ ३४ कसोटी खेळला आहे. एवढ्या लवकर कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नये. होय, पण तो नक्कीच योग्य मार्गावर आहे आणि तो भारताचा महान यष्टिरक्षक बनेल.’

कार्तिक धोनीबद्दल काय म्हणाला?

कार्तिकने धोनीच्या यष्टिरक्षक म्हणून कारकिर्दीवर प्रकाश टाकला आणि कर्णधार म्हणून माहीच्या कामगिरीमुळे तो पंतपेक्षा अधिक सरसर असल्याचे निदर्शनास आणले. तो म्हणाला, ‘यष्टीरक्षक म्हणूनही धोनीच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करू नका. त्याने केवळ शानदार फलंदाजी केली नाही तर गरज असेल तेव्हा धावा पण केल्या. त्याचबरोबर भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या जेतेपदापर्यत नेले. भारत त्याच्या नेतृत्त्वाखाली कसोटी क्रमवारीत बराच काळ पहिल्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाडूबद्दल बोलता, तेव्हा तुम्हाला त्याच्या सर्व गोष्टी माहित असल्या पाहिजेत.’

हेही वाचा – IND vs BAN सामन्यादरम्यान ‘या’ भारतीय खेळाडूवर कोसळला होता दुःखाचा डोंगर, तरीही त्याने पार पाडली जबाबदारी

महेंद्रसिंग धोनीची कारकीर्द –

धोनीने आपल्या कारकिर्दीत ९० कसोटी सामने खेळले आणि ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या, ज्यात सहा शतके आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने कसोटीत स्टंपच्या मागे सर्वाधिक (२९४) फलंदाजाना बाद करणाऱ्या यादीत पाचव्याय क्रमांकावर आहे. २००९ मध्ये न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकणारा तो मन्सूर अली खान पतौडीनंतरचा दुसरा भारतीय कर्णधार ठरला.

हेही वाचा – ‘मुलींना काय गिफ्ट देणार…’, पत्नीच्या ‘फिरकी’वर रविचंद्रन अश्विन ‘क्लीन बोल्ड’, BCCI ने शेअर केला मुलाखतीचा VIDEO

त्याच्या नेतृत्वाखाली, भारत एका वर्षात प्रथमच जगातील नंबर वन कसोटी संघ बनला आणि दक्षिण आफ्रिकेतील पहिली कसोटी मालिका १-१अशी बरोबरीत सोडवली. दुसरीकडे, पंतने आतापर्यंत ३४ कसोटी सामन्यांमध्ये ४४.७९ च्या सरासरीने २४१९ धावा केल्या आहेत, ज्यात सहा शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. तो आतापर्यंत १३४ फलंदाजांना स्टंपच्या मागे बाद करण्यासह भारताचा तिसरा सर्वात यशस्वी यष्टिरक्षक आहे.