IND vs BAN 2nd T20I India beat Bangladesh by 86 runs : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने तिन्ही क्षेत्रात दमदार प्रदर्शन करत बांगलादेशचा ८६ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर मालिका २-० ने खिशात घातली. या सामन्यात अगोदर भारताने रिंकू आणि नितीश यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २२१ धावांचा डोंगर उभारला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केल्याने बांगलादेशचा ९ बाद १३५ धावांवरच मर्यादित राहिला. यासह घरच्या मैदानावर सलग सातवी मालिका जिंकली.

बांगलादेशकडून महमुदुल्लाहने सर्वाधिक धावा केल्या, तो ३९ चेंडूंत तीन षटकारांच्या मदतीने ४१ धावा करून बाद झाला. भारताकडून नितीश रेड्डीने बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी करत दोन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी गेल्या सामन्यात छाप पाडणारा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीनेही दोन विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे भारताच्या प्रत्येक गोलंदाजाला एक विकेट मिळाली. नितीश आणि वरुणशिवाय अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, मयंक यादव आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारतीय गोलंदाजांपुढे बांगलादेशचे फलंदाज सपशेल अपयशी –

लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची फलंदाजी अत्यंत खराब राहिली. महमुदुल्लाह वगळता अन्य कोणताही फलंदाज प्रभाव पाडू शकला नाही. बांगलादेशने नियमितपणे विकेट गमावल्या आणि त्यांचे फलंदाज भागीदारी करु शकले नाहीत, ज्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले. नितीश रेड्डी, भारतासाठी आपला दुसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळत असताना, त्याने अष्टपैलू कामगिरी केली आणि चेंडू तसेच बॅटने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे भारताने बांगलादेशविरुद्ध टी-२० मध्ये आपले वर्चस्व कायम राखले आहे. आता या दोन्ही संघांमधील या मालिकेतील अंतिम सामना १२ ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.

हेही वाचा – मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसणाऱ्या रोहितच्या लॅम्बोर्गिनीची किंमत किती? कारचा नंबर तर आहे खूपच खास

रिंकू-नितीशची चौथ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी –

बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण भारताने वेगवान सुरुवात केली. मात्र बांगलादेशच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्येच भारताला तीन धक्के देत संघाला अडचणीत आणले. सुरुवातीच्या धक्क्यानंतर संघाला सावरत नितीश आणि रिंकूने आक्रमक फलंदाजी केली आणि चौथ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. यादरम्यान नितीशने आपला दुसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळताना कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले.

हेही वाचा – Rohit Sharma : IND vs BAN टी-२० मालिका सुरु असतानाच रोहितने केलं असं काही की…VIDEO होतोय व्हायरल

अर्धशतकानंतरही नितीशने आपली आक्रमक फलंदाजी थांबवली नाही आणि मोठे फटके खेळणे सुरूच ठेवले. मात्र, तो ३४ चेंडूंत चार चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने ७४ धावा करून बाद झाला. नितीश बाद झाल्यानंतर रिंकू सिंगनेही अर्धशतक झळकावले, मात्र तो २९ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिक पंड्याने काही मोठे फटके खेळले आणि भारताची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली, पण भारतीय संघाने शेवटच्या षटकात तीन विकेट्स गमावल्या. हार्दिक १९ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३२ धावा करून बाद झाला. बांगलादेशकडून रिशाद हुसेनने तीन तर तस्किन अहमद, तन्झिम हसन शाकिब आणि मुस्तफिजुर रहमानने प्रत्येकी दोन गडी बाद केले.