IND vs BAN India beat Bangladesh by 133 runs : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्याच्या टी-२० मालिकेतील शेवटचा हैदराबादमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने संजू शतकी आणि सूर्याच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर १३३ धावांनी दणदणीत पराभव केला. त्याचबरोबर सलग तिसरा सामना जिंकत बांगलादेशला क्लीन स्वीप केलं. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ६ बाद विक्रमी २९७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेश संघ निर्धारित २० षटकात १६४ धावाच करु शकला. अशा प्रकारे भारतीय संघाने दसऱ्यालाच दिवाळी साजरी केली.

भारताकडून बिश्नोईने तीन, तर वेगवान गोलंदाज मयंक यादवने दोन विकेट्स घेतल्य. बांगलादेशकडून तौहीदने ४२ चेंडूत ६३धावा केल्यानंतर नाबाद राहिला. भारताने कसोटी मालिकेतही बांगलादेशचा २-० असा क्लीन स्वीप केला होता आणि आता टी-२० मालिकेतही क्लीन स्वीप करण्यात त्यांना यश आले. या सामन्यात भारताने आपल्या टी-२० इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आणि सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाज बांगलादेशवर दडपण आणण्यात यशस्वी ठरले.

संजू सॅमसनने झळकावले टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक –

संजू सॅमसनने या सामन्यात केवळ दमदार शतकच केले नाही तर एक मोठा विक्रमही रचला आहे. संजू सॅमसनने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी दुसरे सर्वात जलद शतक झळकावले. भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम आजही टीम इंडियाचा माजी टी-२० कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अवघ्या ३५ चेंडूत शतक झळकावले. संजूने या सामन्यात एकूण ४७ चेंडूत ११ धावा केल्या. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि ८ षटकारही मारले. संजूच्या या खेळीमुळे भारतीय संघाने या सामन्यात २० षटकात २९७ धावा केल्या. जी टी-२० आंतरराष्ट्रीय मधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे.

हेही वाचा – IND vs BAN : भारताने उभारली टी-२० मधील सर्वात मोठी धावसंख्या, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील दुसराच संघ

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या नोंदवणारे देश :

  • ३१४/३ – नेपाळ विरुद्ध मंगोलिया, हांगझोऊ, २०२३
  • २९७/६ – भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, २०२४
  • २७८/३ – अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, डेहराडून, २०१९
  • २७८/४ – झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्की, इल्फोव्ह काउंटी, २०१९
  • २६८/४ – मलेशिया विरुद्ध थायलंड, हांगझोऊ, २०२३
  • २६७/३ – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज, तारौबा, २०२३

हेही वाचा – IND vs BAN : भारतीय संघाने दसऱ्यालाच साजरी केली दिवाळी, उत्तुंग फटकेबाजीसह दणदणीत विजय

सूर्याचा विजयरथ सुसाट –

टी-२० विश्वचषक २०४ च्या फायनलमधील विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सूर्याला टीम इंडियाचे कर्णधारपद करण्यात आले. कर्णधार होताच सूर्याने आपली जादू दाखवली आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकापाठोपाठ एक सामने जिंकत आहे. श्रीलंकेला क्लीन स्वीप केल्यानंतर आता टीम इंडियाने बांगलादेशचाही क्लीन स्वीप केले आहे. भारतासाठी सर्वाधिक टी-२० सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत सूर्या आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. सूर्याने या प्रकरणात हार्दिक पंड्याला मागे टाकले आहे.

भारतासाठी सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारे कर्णधार :

  • रोहित शर्मा – ५० विजय
  • एमएस धोनी – ४२ विजय
  • विराट कोहली – ३२ विजय
  • सूर्यकुमार यादव – ११ विजय
  • हार्दिक पंड्या – १० विजय