IND vs BAN 1st Test : Basit Ali lashes out Bangladesh Captain : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. चेन्नईच्या मैदानावर भारताने ५१५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा दुसरा डाव २३४ धावांत आटोपला. ज्यामुळे पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकून आलेल्या बांगलादेशला भारताने २८० धावांनी पराभवाची धूळ चारली. यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अलीने बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोवर निशाणा साधला आहे. त्याने शांतोला त्याच्या वक्तव्याची आठवण करून दिली.

बासित अली काय म्हणाला?

खरं तर, शांतोने पाकिस्तानप्रमाणेच भारताविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकण्याचा मानस व्यक्त केला होता. भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी तो म्हणाला होत, “पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक मालिका विजयानंतर बांगालदेश संघाचा आणि देशातील लोकांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. भारताविरुद्धची मालिका आमच्यासाठी महत्वाची असून आम्ही दोन्ही सामने जिंकण्यासाठी खेळू.” या वक्तव्यावरून बासितने शांतोवर निशाणा साधला आहे. तो म्हणाला की, शांतोने भारतासोबत माईंड गेम खेळायला नको होता. कारण भारत खूप मजबूत संघ आहे.

बासित अलीची शांतोवर टीका –

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना बासित अली म्हणाला, “भारताने पहिली कसोटी सहज जिंकली. भारत जिंकण्यासाठी पात्र होता. भारत आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये खूप फरक आहे. बांगलादेशला हे समजले असेल. भारताने दाखवून दिले की त्यांच्यात आणि बांगलादेशच्या क्रिकेटमध्ये काय फरक आहे. त्यामुळे आता बांगलादेशला नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना होणारे नुकसान लक्षात आले असेल. लक्षात ठेवा, जे संघ कसोटीच्या पहिल्या दोन तासांबद्दल विचार करतात ते कधीही यशस्वी होत नाहीत. जे सामन्याच्या शेवटापर्यंतचा विचार करुन रणनिती आखतात ते विजयी होतात.”

हेही वाचा – IND vs BAN: पहिल्या कसोटीनंतर WTC Final मध्ये जाण्यासाठी भारताला किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या समीकरण

भारतासोबत माईंड गेम खेळायला नको होता –

तो पुढे म्हणाला, “पाच गोलंदाज खेळवून काय फायदा होतो, हे सर्वांनी पाहिले आहे. गंभीर म्हणाला होता की मला २० विकेट्स हव्या आहेत. सामने विकेट्स घेऊनच जिंकले जातात. दुसऱ्या डावात भारताने किती विकेट गमावल्या हे तुम्ही बघा. फक्त चार खेळाडू आऊट झाले. या सामन्यात बांगलादेशने १४ विकेट्स घेतल्या तर भारताने २० विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये तुम्हाला ६ विकेट्सचे नुकसान दिसून येईल. त्यामुळे शांतोने मालिकेपूर्वी २-० ने जिंकू, असे वक्तव्य करुन माईंड गेम खेळायला नको होता. कारण हा पाकिस्तानचा संघ नाही.”