IND vs BAN Rishabh Pant reveals Rohit Sharma message before declaration : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे खेळला गेला. टीम इंडियाने चौथ्या दिवशी पहिल्या सत्रातच हा सामना जिंकला होता. आर अश्विनपासून ते ऋषभ पंत आणि शुबमन गिलने सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. चेन्नई कसोटीत पंतने शानदार पुनरागमन केले, त्याने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. सामना संपल्यानंतर पंतने सांगितले की, त्याला वेगवान खेळी का खेळावी लागली?

रोहित शर्माने इतका वेळ दिला होता –

ऋषभ पंत दुसऱ्या डावात वेगवान फलंदाजी करताना दिसला. आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पंतने झटपट आपले शतक पूर्ण केले. सामना समाप्तीनंतर ऋषभ पंतने सांगितले की, त्याला इतक्या वेगाने फलंदाजी का करावी लागली. पंत म्हणाला की, “रोहित भाईने अगोदरच सांगितले होते की, तुम्हाला जे काय धावा करायच्या आहेत, त्या करण्यासाठी तुमच्याकडे फक्त एक तासाचा कालावधी आहे, म्हणून मला वाटले की आपण रिस्क घेऊ चालणार नाही. त्यामुळे मी अर्धशतकानंतर पटपट धावा करत शतक झळकावले.” कारण टीम इंडियाला लवकर डाव घोषित करायचा होता.

ऋषभ पंतने धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली –

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने पुनरागमनानंतर भारत वि बांगलादेशमधील पहिल्या कसोटीत शानदार शतक झळकावले आहे. ऋषभ पंतने रस्ते अपघातानंतर तब्बल ६३३ दिवसांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आणि पुनरागमनानंतर पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावत त्याने पुनरागमनाचा डंका वाजवला. पंतने १२४ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि ४ षटकारांसह आपले सहावे कसोटी शतक झळकावले. यासह पंतने धोनीच्या मैदानावरच त्याच्या शतकांची बरोबरी केली.

हेही वाचा – IND vs BAN सामन्यात गोंधळ! मोहम्मद सिराज बांगलादेशच्या कर्णधाराशी भिडला, बोट दाखवतानाचा VIDEO व्हायरल

भारताचा बांगलादेशवर तब्बल २८० धावांनी विजय –

भारतीय संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा तब्बल २८० धावांनी पराभव केला आहे. भारताने बांगलादेशला विजयासाठी ५१५ धावांचे आव्हान दिले होते आणि २३४ धावांवर बांगलादेशला ऑल आऊट करत कसोटी मालिकेत १-० ने आघाडी मिळवली आहे. रविचंद्रन अश्विनच्या ६ विकेट्सच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात एकतर्फी दबाव आणला.