IND vs BAN India broke Pakistan’s world record : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाची प्रत्येक चाल बरोबर होती. बांगलादेशविरुद्ध भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. बांगलादेशचा संघ अवघ्या १२७ धावांवर गारद झाला. यानंतर भारतीय संघाने या लक्ष्याचा सहज पाठलाग केला. हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग यांनी टीम इंडियासाठी अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान मागे टाकत विश्वविक्रम केला आहे.

मयंक यादव आणि नितीश रेड्डी यांचं पदार्पण –

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्याने उदयोन्मुख आयपीएल गोलंदाज मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांचं पदार्पण केलं. यासह आतापर्यंत भारताकडून ११७ खेळाडूंनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक खेळाडूचे पदार्पण करण्यात भारत पहिल्या स्थानावर पोहोचत पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडला. पाकिस्तानकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण ११६ खेळाडू खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत एकूण १११ खेळाडूंनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक खेळाडूंचे पदार्पण करणाऱ्या संघांची यादी:

  • भारत – ११७
  • पाकिस्तान – ११६
  • ऑस्ट्रेलिया – १११
  • श्रीलंका – १०८
  • दक्षिण आफ्रिका – १०७
  • इंग्लंड – १०४
  • न्यूझीलंड – १०३

हेही वाचा – Abhishek Sharma : संजू सॅमसनची की अभिषेक शर्माची, रनआऊटमध्ये नक्की चूक कोणाची? पाहा VIDEO

भारतीय गोलदाजांची शानदार कामगिरी –

२२ वर्षीय मयंक यादवने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच अप्रतिम कामगिरी केली. त्याने आपल्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिल्याच षटक निर्धाव टाकले. यानंतर दुसऱ्या षटकात त्याने विकेट घेतली. भारतीय प्लेईंग इलेव्हनमध्ये १२ वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या वरुण चक्रवर्तीने तीन विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय अर्शदीप सिंगने ३.५ षटकांत तीन विकेट्स घेतल्या. भारतीय गोलंदाजांच्या शानदार कामगिरीपुढे बांगलादेशच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही, ज्यामुळे त्यांचा संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही.

हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या No Look शॉटने चाहत्यांना लावलं वेड, VIDEO होतोय तुफान व्हायरल

हार्दिक पंड्याने ठोकला विजयी षटकार –

संजू सॅमसनने संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्याने २९ धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार सूर्यकुमार यादवने १४ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांसह २९ धावा केल्या. हार्दिक पंड्याने षटकार ठोकत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याने १६ चेंडूत ३९ धावांची खेळी साकारली. आपल्या खेळीदरम्यान हार्दिकने ५ चौकार आणि २ षटकार मारले.