IND vs BAN Rishabh Pant sets Bangladesh fielding in 1st Test match : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी चेन्नईत खेळली जात आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना बांगलादेशचे क्षेत्ररक्षण लावताना दिसला. जेव्हा फलंदाजी करताना पंतने हे केले, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तो क्षेत्ररक्षण लावण्यासाठी सल्ला देताना आवाज स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाला. त्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. यानंतर ऋषभने स्वत: सागितले की त्याने असे का केले?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऋषभ पंतने फलंदाजी करताना बांगलादेशी संघाला मिडविकेटवर क्षेत्ररक्षक ठेवण्याचा सल्ला दिला. ज्यामुळे सर्वांना महान यष्टिरक्षक एमएस धोनीचीही आठवण झाली. व्हिडीओमध्ये ऋषभ सांगताना दिसत आहे की, “भाई, एक तिकडे मिडविकेटवर येईल.” पंतने हे तेव्हा सांगितले, जेव्हा शुबमन गिल स्ट्राइकवर होता. ऋषभ पंतला क्षेत्ररक्षण लावताना सांगताना पाहून समालोचकांनाही हसू आवरले नाही. समालोचक म्हणाले, “पंत म्हणाला की येथे क्षेत्ररक्षक हवा आणि गोलंदाजानेही तेच केले.”

पंतच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत. एका चाहत्याने म्हटले की, “पंत एक अद्भुत व्यक्ती आहे.” दुसरा म्हणाला,“ त्याने बांगलादेशच्या कर्णधाराचे काम सोपे केले.” तर अजून एक म्हणाला, “धोनीने वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध हे केले होते.”२०१९ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये धोनीने बांगलादेशला क्षेत्ररक्षण लावण्यासाठी सल्ला दिला होता.

हेही वाचा – Virat Kohli : ‘यॉर्करवर यॉर्कर टाकतोयस, तू काय मलिंगा…’, विराटने शकीबला विचारलेला प्रश्न स्टंप माईकमध्ये कैद, VIDEO व्हायरल

ऋषभ पंतने धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली –

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने पुनरागमनानंतर भारत वि बांगलादेशमधील पहिल्या कसोटीत शानदार शतक झळकावले आहे. ऋषभ पंतने रस्ते अपघातानंतर तब्बल ६३३ दिवसांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आणि पुनरागमनानंतर पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावत त्याने पुनरागमनाचा डंका वाजवला. पंतने १२४ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि ४ षटकारांसह आपले सहावे कसोटी शतक झळकावले. यासह पंतने धोनीच्या मैदानावरच त्याच्या शतकांची बरोबरी केली आहे.

हेही वाचा – IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! कोणत्या खेळाडूंना मिळाली संधी? जाणून घ्या

ऋषभ पंतने फलंदाजी करताना बांगलादेशची फिल्डिंग का सेट केली?

काही वेळातच पंतचा हा व्हिडिओचांगलाच व्हायरल झाला आणि मग कॉमेंटेटर्सने यावर चर्चा केली. ब्रॉडकास्टिंग टीमचा भाग असलेल्या माजी यष्टिरक्षक सबा करीम यांनी भारताच्या विजयानंतर पंतला विचारले की, ‘हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसऱ्या डावात तस्किन अहमद गोलंदाजी करायला येत होता. तुम्ही त्याच्यासाठी मैदान सेट करायला का सुरुवात केली? अतिशय प्रामाणिक प्रश्न. आता तूच सांग बांगलादेशचा कर्णधार कोण शांतो की ऋषभ पंत? शांतोनेही तू सांगितलं तसं ऐकलं, असं का?’

सबा करीम यांच्या प्रश्नांच्या उत्तरात ऋषभ पंत म्हणाला, “कधीकधी अजय जडेजा यांच्याशी मैदानाबाहेर चर्चा होते. त्यांचं म्हणण आहे की, कुठेही खेळा. इतर संघ खेळत असो किंवा स्वतः खेळत असाल. क्रिकेट हे चांगलंच खेळलं गेलं पाहिजे. त्यामुळे तिथे मिडविकेटवर एकही क्षेत्ररक्षक नव्हता आणि एका ठिकाणी दोन क्षेत्ररक्षक उभे होते, म्हणून मी म्हणालो, इथे एक क्षेत्ररक्षक ठेवा.”

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताला मोठा फायदा, पराभवामुळे बांगलादेशला फटका, तर ‘या’ संघांना झाला फायदा

भारताचा बांगलादेशवर तब्बल २८० धावांनी विजय –

भारतीय संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा तब्बल २८० धावांनी पराभव केला आहे. भारताने बांगलादेशला विजयासाठी ५१५ धावांचे आव्हान दिले होते आणि २३४ धावांवर बांगलादेशला ऑल आऊट करत कसोटी मालिकेत १-० ने आघाडी मिळवली आहे. रविचंद्रन अश्विनच्या ६ विकेट्सच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात एकतर्फी दबाव आणला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban rishabh pant sets bangladesh fielding in 1st test match watch viral video people remember ms dhoni vbm