IND vs BAN Sanju Samson reaction after century : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात मोठा धमाका केला. त्याने ४० चेंडूत वादळी शतक झळकावत टीम इंडियाला धावांचा डोंगर उभारण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ बाद २९७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ ७ बाद १६४ धावाच करु शकला. ज्यामुळे भारताने १३३ धावांनी विजय मिळवत तीन सामन्याच्या मालिकेत क्लीन स्वीप दिला. सामन्यानंतर बोलताना संजू सॅमसनने आपल्या खेळीबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

सामन्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिक जेव्हा संजू सॅमसनची मुलाखत घेत होता, तेव्हा त्याने त्याला विचारले की त्याच्या सहकाऱ्यांचा उत्साह कसा आहे? सामना संपल्यानंतर २९ वर्षीय फलंदाजाला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, तेव्हा त्याचे सहकारी मोठ्याने जल्लोष करत होते. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत तो म्हणाला, ‘ड्रेसिंग रुममधील ऊर्जा आणि तेथे उपस्थित असलेले सहकारी माझ्यासाठी खूप आनंदी आहेत. इतरांना माझ्यासाठी आनंदी होताना पाहून मला खूप आनंद होत आहे.’

‘मी खूप वेळा अपयशी ठरलो आहे’ –

आपल्या कारकिर्दीतील चढ-उतारांबद्दल बोलताना सॅमसनने कबूल केले की अनेक अपयशांना तोंड दिल्यानंतर तो दबाव कसा हाताळायचा हे शिकला आहे. पहिल्या दोन सामन्यात चांगली सुरुवात केल्यानंतरही संजू बाद झाला. येथे तो म्हणाला, ‘मला हे देखील जाणवले आहे की मी खूप चांगले करू शकतो, परंतु अनेक सामने खेळल्यानंतर मला दबाव आणि माझ्या अपयशांना कसे सामोरे जावे, हे माहित आहे. कारण मी खूप वेळा अपयशी ठरलो आहे.’

हेही वाचा – PAK vs ENG : पाकिस्तानने दुसरी कसोटी जिंकण्यासाठी आखला नवा डावपेच, खेळपट्टीबाबत घेतला मोठा निर्णय

‘मला सर्वांनी पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद’ –

पहिल्या दोन सामन्यात लवकर बाद झाल्यानंतरही तिसऱ्या सामन्यात संधी दिल्याबद्दल संजू सॅमसनने संघ व्यवस्थापन आणि कोचिंग स्टाफचे आभार मानले. तो म्हणाला, ‘तुमच्या देशासाठी खेळण्याचे दडपण होते, पण मला कामगिरी करून दाखवायची होती. कर्णधाराने मला सांगितले होते की माझा तुला पाठिंबा आहे. मग मागील मालिकेत काहीही झालेले असो. श्रीलंकेविरुद्धच्या माालिकेत मी दोनदा शून्यावर आऊट झालो होतो. त्यामुळे माझे काय होणार? या विचारात मी केरळला परतलो होतो, पण मी आज सर्वांच्या पाठिंब्यामुळे इथे आहे.’