IND vs BAN Sanju Samson honored by Shashi Tharoor : भारत आणि बांगलादेश यांच्यात १२ ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना खेळला गेला होता. या सामन्यात संजूने सॅमसने वादळी अर्धशतक झळकावत भारताला १३३ धावांनी विजय मिळवला होता. त्याने अवघ्या ४० चेंडूत शतक झळकावत भारताला २९७ धावांचा डोंगर उभा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता टी-२० मालिका संपल्यानंतर संजू सॅमसन केरळला परतला असून येथे काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी त्याचे जंगी स्वागत केले आहे.

शशी थरूर यांनी संजूचे हिरोप्रमाणे केले स्वागत –

हैदराबादमध्ये शानदार शतक झळकावल्यानंतर संजू सॅमसन तिरुअनंतपुरमला पोहोचला, तेव्हा त्याचे एखाद्या हिरोसारखे स्वागत करण्यात आले. इतकेच नाही तर तिरुवनंतपुरमचे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी २९ वर्षीय संजू सॅमसन यांचे त्यांच्या घरी स्वागत केले आणि दक्षिण भारतीय पारंपारिक ‘पोनाडा’, शाल देऊन त्याचा सन्मान केला. शशी थरूर यांनी ट्विट केले की, बांगलादेशविरुद्धच्या शानदार शतकानंतर तिरुअनंतपुरमला परतल्यावर संजू सॅमसनचे हिरोप्रमाणे स्वागत करताना आनंद होत आहे.

शशी थरूर हे नेहमीच संजू सॅमसनचे चाहते राहिले आहेत आणि भारतीय संघात त्याला जे स्थान मिळायला हवे होते, ते न मिळाल्याबद्दल बऱ्याचदा व्यक्त झाले आहेत. जुलैमध्ये संजू सॅमसनला श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने त्यांनी निवड समितीवर जोरदार टीका केली होती. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असलेला संजू सॅमसनची टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघात निवड करण्यात आली होता, परंतु त्याला या स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर त्याला झिम्बाब्ले दौऱ्यात संधी देण्यात आली होती. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यातून वगळण्यात आले.

हेही वाचा – IND vs AUS : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडू झाला बाहेर

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात संजू सॅमसनने स्फोटक खेळी केली. उजव्या हाताच्या फलंदाजाने अवघ्या ४७ चेंडूत १११ धावा करून पहिले टी-२० शतक झळकावले. त्याने ४७ चेंडूत ८ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने १११ धावा केल्या. या कालावधीत त्याचा स्ट्राइक रेट २३६.७१ होता. त्याचे हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारतासाठी दुसरे वेगवान शतक ठरले.