India vs Bangladesh 1st T20I: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज ६ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या नव्या सलामीच्या जोडीबाबत सूर्याने मोठा खुलासा केला आहे. बांगलादेशविरुद्ध टीम इंडियासाठी कोणती जोडी सलामीसाठी उतरेल हे त्याने सांगितले आहे. त्याच्या या निर्णयामुळे सर्व भारतीय चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

भारत वि बांगलादेश टी-२० मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेरमध्ये होणार आहे. जिथे हा सामना नवीन ठिकाणी खेळवला जाणार आहे. ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या ठिकाणी आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही.

हेही वाचा – Rohit Sharma: “तुम्हाला हवं ते बोला, पंच-रेफरींना नंतर बघून घेऊ”, रोहितने खेळाडूंना वर्ल्डकप फायनलमध्ये शेरेबाजी करण्याची दिलेली सूट, स्वत: केला खुलासा

टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, “संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियासाठी सलामीला उतरताना दिसणार आहेत.” या दोन खेळाडूंनी आजपर्यंत कधीही भारतीय संघासाठी एकत्र सलामी दिली नाही. तथापि, दोघांनी वेगवेगळ्या प्रसंगी भारतासाठी अनेक वेळा सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे. अभिषेक शर्मासाठी ही मोठी संधी असणार आहे. अभिषेक शर्मा पहिल्यांदाच भारतात सामना खेळणार आहे. आयपीएलमध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. आयपीएलमधील सलामी देताना अभिषेकने जशी विस्फोटक फलंदाजी केली, याच कामगिरीची चाहत्यांना आताही अपेक्षा आहे.

हेही वाचा – IND-W vs PAK-W Live score : भारतीय डावाला सुरुवात, शफाली वर्माला पहिल्याच षटकात मिळाले जीवनदान

भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनसमोर मोठे आव्हान आहे. संजू गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही खास कामगिरी करू शकलेला नाही. सूर्याने दिलेल्या संधीचा फायदा घेत चांगली कामगिरी करण्यावर त्याची नजर असेल. संजू सॅमसनने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी अनेक वेळा सलामी दिली आहे. त्यामुळे संजू टीम इंडियातील आपल्या नव्या सलामीवीराबरोर कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चाहत्यांनाही संजूकडून खूप अपेक्षा आहेत.

संजू सॅमसनने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून फक्त दोन सामने खेळले आहेत. जिथे त्याने ४५.५० च्या सरासरीने आणि १७५.९२ च्या स्ट्राईक रेटने ९५ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली कोणाकोणाला मिळणार संधी? जाणून घ्या भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारतीय संघ:
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मयंक यादव, अर्शदीप सिंग, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, नितीश रेड्डी , हर्षित राणा